जेईई आणि नीटबाबत महत्वाचा निर्णय; वर्ष २०२१ साठी अभ्यासक्रमात बदल नाही

exam4.jpg
exam4.jpg

नाशिक : आयआयटी जेईई (ॲडव्हान्स)साठी घेतलेला निर्णय आणि मागील शैक्षणिक वर्षासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षे (मुख्य)साठी बारावीमध्ये किमान ७५ टक्के गुण मिळविण्याचे पात्रता निकष शिथिल केले आहेत. एनआयटी, आयआयआयटी, एसपीए आणि इतर सीएफटीआयशी संबंधित प्रवेश जेईई (मुख्य)वर आधारित आहेत. 

२०२१ साठी अभ्यासक्रमात बदल नाही 

जेईई आणि नीटच्या २०२१ साठी अभ्यासक्रमात बदल होणार नाही. मात्र यंदा जेईई आणि नीट परीक्षांमधील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उमेदवारांना पर्याय उपलब्ध असतील. जेईई (मुख्य २०२१)चा अभ्यासक्रम मागील वर्षाप्रमाणे राहील. विद्यार्थ्यांना मात्र ९० प्रश्नांपैकी ७५ प्रश्नांची (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितातील प्रत्येकी २५ प्रश्न) उत्तरे देण्याचा पर्याय असेल. जेईई (मुख्य) २०२० मध्ये विद्यार्थ्यांना सर्वच ७५ प्रश्नांची उत्तरे (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयातील प्रत्येकी २५ प्रश्नांची) उत्तरे बंधनकारक होती. नीट (यूजी) २०२१ चे नेमके स्वरूप अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र देशातील काही मंडळांनी अभ्यासक्रम कमी केल्याच्या पार्श्वभूमीवर नीट (यूजी) २०२१ प्रश्नपत्रिकेत जेईई (मुख्य)च्या धर्तीवर पर्याय असतील. 

७५ टक्के गुणांच्या पात्रता निकषात शिथिलता 

केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई मुख्यच्या २०२१-२२ साठी बारावीच्या ७५ टक्के गुणांच्या निकषात शिथिलता देण्यात आल्याचे मंगळवारी (ता. १९) ‘ट्विट’ केले आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थे (एनटीए)द्वारे घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी), भारतीय अभियांत्रिकी विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (आयआयईएसटी) आणि इतर केंद्रीय अनुदानित तांत्रिक संस्थे(सीएफटीआय-आयआयटी वगळता)मध्ये विविध यूजी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो. आयआयटी, एनआयटी, आयआयआईएसटी आणि इतर सीएफटी अभ्यासक्रमामधील विद्यार्थ्यांचे प्रवेश हे जेईई ‘रँक’वर आधारित आहेत. या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळण्यास पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत किमान ७५ टक्के गुण मिळाले पाहिजेत अथवा संबंधित मंडळांकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अग्रणी २० टक्क्यांमध्ये असले पाहिजेत. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी बारावीच्या परीक्षेतील पात्रता गुण ६५ टक्के आहेत. 

जेईई मुख्यसाठी अर्जाची मुदतवाढ 

जेईई मुख्य परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत संपली होती. या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. २३ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. २४ जानेवारीपर्यंत ऑनलाइन शुल्क भरता येईल. तसेच २७ ते ३० जानेवारीला अर्जात दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध असेल.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com