खासदार निवडून आणून कॉंग्रेसशी बोलणी  - ऍड. आंबेडकर 

खासदार निवडून आणून कॉंग्रेसशी बोलणी  - ऍड. आंबेडकर 

मालेगाव - लोकशाही सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचल्यास कोणाची संविधानाला हात लावण्याची ताकद होणार नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशारावर चालणारे हे सरकार उखडून फेकून द्या असे सांगत खासदार निवडून आणल्यानंतर कॉंग्रेस पक्षाशी बोलणी करेल असे वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी काल (ता.13) येथे सांगितले. 

वंचित बहुजन आघाडीच्या येथील कॉलेज ग्राऊंडवर झालेल्या सत्ता संपादन मेळाव्यात ते बोलत होते. श्री. आंबेडकर यांनी यावेळी धुळे- मालेगाव लोकसभा मतदारसंघातून आघाडीतर्फे कमाल हाशीम यांच्या उमेदवारीची घोषणा केली. यानंतर दोघांसह व्यासपीठावरील उपस्थितांनी हात उंचावून या उमेदवारीला समर्थन दिले. 

श्री. आंबेडकर म्हणाले, की कॉंग्रेस, भाजप यासह प्रस्थापित पक्षांनी काही कुटुंबांपुरतीच सत्ता मर्यादीत ठेवली. कॉंग्रेसने आरएसएस या बेलगाम घोड्याला घटनेच्या व संविधानाच्या चौकटीत आणण्याचा आराखडा द्यावा. आम्ही युतीसाठी तयार आहोत. कॉंग्रेसने तीन महिन्यात आराखडा दिला नाही. त्यामुळे त्यांच्यावर विश्‍वास नाही. धर्मवादी, जातीवादी हल्ला करतात. त्यांनी लोकशाही कैद केली. नोटबंदीमुळे रोजगार निर्मिती ठप्प झाली. बेरोजगारी वाढली. उद्योग बंद पडले. थेट खात्यावर अनुदान दिल्याने कोट्यावधी रुपये वाचल्याचा प्रचार होत आहे. मग रिझर्व्ह बॅंकेच्या निधीवर तुमचा डोळा कसा? अनेक उद्योगपती बॅंकांचा पैसा घेवून पळून गेले. हे सरकार दुसऱ्याच्या हाताने खाते. राफेल विमानाच्या स्पेअरपार्टची हमी काय? हे विमान वापरता येईल की नाही याची शंका आहे. 

देश पातळीवर भाजपशी लढा व प्रखर विरोध प्रादेशिक पक्षच करीत आहेत. कॉंग्रेसने विरोध केला नाही. याउलट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गुणगाण सोनिया गांधी व कॉंग्रेस नेते करीत आहेत. ओबीसी तरुणांना या शासनाने शिष्यवृत्ती दिली नाही. यामुळे 15 टक्के विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले. वंचित आघाडी देणगी, वर्गणी व तुमच्या सामर्थ्याच्या बळावर निवडणूक लढविणार आहे. सर्व समावेशक उमेदवार देऊ. त्यांना साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले. 

सभेत प्रदेश महासचिव अमीत भुईगळ, जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे, एमआयएमचे मनपा गटनेते डॉ. खालीद परवेज, सुफी गुलाम रसुल, प्रा. किसन चव्हाण, शांताराम बोरसे, अरूण गायकवाड, द्यानेश्वर ढेपले, दिशा पिंकी शेख, अनिल जाधव आदींची भाषणे झाली. तत्पुर्वी वंचित बहुजन आघाडीच्या सांस्कुतिक जलश्‍याने सभेला उपस्थितांची मने जिंकली. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. 

"एमआयएम' शी युतीचे समर्थन 
देशाला चामडे व कापड उद्योग सर्वाधिक परकीय गंगाजळी उपलब्ध करून देतो. मात्र हा उद्योग उपेक्षित वंचित करतात. यामुळे त्यांना सुविधा, वीजबिलात सवलत दिली जात नाही. या दोन उद्योगांना अर्थसहाय्य दिल्यास मोठे परकीय चलन मिळेल. यंत्रमागाला स्वस्त वीज व सुविधा द्या. येथील कापड चीनच्या कापडाशी स्पर्धा करेल. पवनचक्‍क्‍या व सौरउर्जेचे खासगीकरण नको होते.यावर सरकारची मालकी असती तर सवलतीत वीज देणे शक्‍य झाले असते असे सांगताना ऍड. आंबेडकर यांनी येथील जनतेच्या भावनांना हात घातला. त्याचवेळी एमआयएम व आम्ही एकाच ताटात, एकाच पंक्तीत जेवतो. कॉंग्रेस वंचितांना उमेदवारी देत नाही. दुसऱ्या पंक्तीत बसवते असे वक्तव्य करीत एमआयएमशी युतीचे त्यांनी समर्थन केले.

वंचित आघाडीतर्फे कमाल हाशीम
धुळे लोकसभा मतदारसंघातून आघाडीतर्फे कमाल हाशीम यांच्या उमेदवारीची घोषणा ॲड. आंबेडकर यांनी या वेळी केली. यानंतर दोघांसह व्यासपीठावरील उपस्थितांनी हात उंचावून या उमेदवारीला समर्थन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com