मनमाड : शहरातून आनंदवाडीमार्गे वंजारवाडी, सटाणा, कऱ्ही, एकवई, माळेगाव, घडगेवाडी, निशाणवाडी, मोहेंगाव, भालूर आदी गावांकडे जाण्यासाठी मनमाड- औरंगाबाद रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक बंद करण्यात येऊन भुयारी मार्ग सुरू करण्यात आला. भुयारी मार्ग सुविधेऐवजी गैरसोयीचा अधिक होत आहे. पावसामुळे भुयारी पुलाखाली कंबरापर्यंत पाणी साचल्याने ग्रामस्थांचे दळणवळण बंद झाले आहे. बस कर्मचारी, ग्रामस्थांनी मिळून एसटी नेण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, त्याला यश आले नाही.
एसटीचा आकार आणि भुयारी मार्गाचा आकार मेळ खात नसल्याने एसटी आतमध्ये शिरत नाही. मोठे प्रयत्न करण्यात आले. खोदलेला मार्ग अगदी चिवळ असल्याने एसटी वळवताही येत नाही. अखेर आलेली एसटी आल्यामार्गे मागे घेण्यात आली. शेतकऱ्यांना बाहेरून चारा आणावा लागतो. मात्र, भुयारी मार्ग चिवळ असल्याने चाऱ्याचे भरलेला ट्रॅक्टर, ट्रक, लग्नाची लक्झरी, कांदे भरलेला ट्रक, टेम्पो आदी वाहने घुसणार नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी अडचण झाली असून, वाहतूक कुठून करायची, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
नाहीतर आंदोलन करू : ग्रामस्थ
रेल्वेने लक्ष देऊन मनमाड- औरंगाबाद रेल्वे मार्गावरील फाटक रस्ता पुन्हा सुरू करावा नाही, तर रेल्वे रुळावरून पूल उभारावा, अशी मागणी केली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही, तर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
नऊ गावांना जाण्यासाठी मार्गाचा अभाव
मनमाड- औरंगाबाद रेल्वे मार्गावर भुयारी मार्ग तयार केला. फाटक बंद झाल्यापासून या गावांमध्ये जाणारी एसटी बंद करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थ, विद्यार्थी, महिलांना जाण्यास मोठी अडचण येत आहे. भुयारी मार्गातून बस शिरत नसल्याने बस कायमची बंद होते की काय, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या गावांना जाण्यासाठी दुसरा मार्गच नाही.
प्रतिक्रिया
रेल्वे फाटक बंद करून भुयारी मार्ग सुरू केला. मात्र, तो नऊ गावातील ग्रामस्थांना अडचणीचा ठरत आहे. भुयारी मार्गातून ना बस घालता येते, ना मोठे वाहन. त्यामुळे भुयारी मार्ग असून नसून खोळंबा असा झाला आहे. रेल्वेने रेल्वे फाटकही नऊ गावांच्या ग्रामस्थांसाठी सुरू ठेवावे.
-सुनील धिवर, वंजारवाडी
|