'अशोका धबधबा' ठरतोय पर्यटकांचे आकर्षण

ashoka waterfall
ashoka waterfall

तळेगाव (ता. इगतपुरी) : गेले दोन अडीच महिने जोरदार बरसणाऱ्या पावसाने सध्या विश्रांती घेतल्याने सगळीकडेच काहिली वाढवणारे उष्ण हवामान जोर धरु लागले आहे.  अशा वातावरणात पावसाळी पर्यटनाचा आनंद काही औरच! आणि त्यातही धबधब्याखाली चिंब भिजायला कुणाला आवडणार नाही? त्यासाठीच पावसाळी पर्यटनासाठी त्यातल्या त्यात योग्य वातावरण आणि योग्य ठिकाणाचा शोध हौशी पर्यटकांकडून घेतला जातोय. अशा या उष्ण वातावरणातही पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर कसारा घाटातील विहिगाव (ता.शहापुर) येथील “अशोका धबधबा” हा वन डे मॉन्सून डेस्टिनेशनच्या शोधात असणाऱ्या पर्यटकांसाठी एक उत्तम पर्याय आहे! नाशिक आणि मुंबई परिसरातील पर्यटक सध्या वन डे पिकनिकसाठी “अशोका” धबधब्याला मोठ्या संख्येने भेट देत आहेत.

गेले काही दिवस धो धो बरसणारा पाउस सध्या थांबल्याने वातावरणातील उष्णता वाढली आहे. अशा वातावरणातही विहिगावचा हा अशोका धबधबा ओसांडून वाहत असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने इथे येवून धबधब्याखाली मनसोक्त भिजण्याची मजा लुटत आहेत. दिवसभरात जवळपास पाचशे पेक्षा जास्त पर्यटक या ठिकाणी भेट देवून धबधब्याखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटतांना दिसत आहेत. सर्वत्र दाट वनराई आणि त्यात डोंगराच्या अगदी पायथ्याला अगदी शांत आणि निसर्गरम्य वातावरणातील हा अशोका धबधबा सध्या निसर्गप्रेमी पर्यटकांना चांगलाच आकर्षित करतांना दिसत आहे. 

कसारा घाट परिसर हा पावसाळयात नेहमीच पर्यटकांसाठी सुखावह पर्यटनाचा आनंद देणारा परिसर आहे. गेले काही दिवस मनसोक्त बरसणाऱ्या पावसाने घाट परिसरात सर्वत्र हिरवेगार गालिचे आणि बहारदार हवा अनुभवायला मिळत आहे. पावसाळी पर्यटनस्थळाच्या शोधात असलेल्या निसर्गप्रेमींसाठी अशोका धबधबा हा उत्तम पर्याय असून मुंबई, ठाणे, कल्याण, वाशी, नवी मुंबई इथल्या पर्यटकांसोबतच नाशिक शहर आणि परिसर त्याचबरोबर स्थानिक इगतपुरी शहर आणि  कसारा परिसरातील पर्यटकही या धबधब्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतांना दिसत आहेत. 

कसे पडले “अशोका” नाव?
पूर्वी या धबधब्याला विहीगावचा धबधबा असेच म्हटले जायचे. मात्र शाहरुख खान आणि करीना कपूरच्या “अशोका” चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण या ठिकाणी झाल्यापासून “अशोका” धबधबा हेच नाव प्रचलित झाले आहे.

नाशिकपासुन अंतर ६० किलोमीटर

■ मुंबईपासून अंतर जवळपास २०० किलोमीटर

कसे जावे?
मुंबईकडून नाशिकला येताना इगतपुरीच्या जरा अलीकडे कसारा घाटातील डाव्या बाजूच्या रस्त्याने जव्हार फाटा आहे, तिथून जवळपास सात किमी अंतरावर विहिगाव आणि अशोका धबधबा आहे.

नाशिक कडून जाण्यासाठी मुंबई महामार्गाने इगतपुरी बायपास मार्गे कसारा घाट आणि घाटाच्या उजव्या बाजूने जव्हार फाट्यापासून सात किमी अंतरावर विहिगाव आणि अशोका धबधबा आहे.

प्रवासाची सोय
एसटी किंवा अन्य कुठलीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. खाजगी वाहन हाच एकमेव उत्तम पर्याय आहे.

मुक्कामाची सोय नसली तरी मुंबई आणि नाशिक दोन्ही ठिकाणाहुन एका दिवसात सहज जावून परत येता येईल असे हे पर्यटन स्थळ आहे.

■ जेवण्यासाठी हॉटेल्स वगैरेची सोय नाही मात्र विहिगाव मधील काही आदिवासी कुटुंब योग्य मोबदल्यात शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारच्या जेवणाची उत्तम सोय करतात. शिवाय मुंबई नाशिक हायवेलगतच्या हॉटेल्सचाही पर्याय आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com