साक्री : गावकारभारी निवडण्यासाठी दाखल होणारे अर्ज, माघारीची प्रक्रिया आता पार पडली आहे. सरपंच होण्याची इच्छा मनाशी बाळगून असलेल्या अनेक इच्छुकांनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ऐन हिवाळ्यात राजकीय चर्चांनी गावागावांत अन् चौकाचौकांत वातावरण गरम होत आहे. ‘मीच सरपंच होणार!’ नव्हे तर ‘मतदार कोणाच्या पारड्यात मताचे दान टाकणार?’ याविषयी उत्सुकता शिगेला पोचली आहे. दुसरीकडे ‘व्हायचे सरपंच तर कर खर्च!’ अशी गत इच्छुक उमेदवारांची होतेय.
तालुक्यातील अनेक लहान-मोठ्या ग्रामपंचायतींचे कारभारी निवडून देण्यासाठी निवडणूक पार पडणार आहे. तसेच जनतेच्या मनातील व्यक्ती थेट सरपंचपदावर विराजमान होणार असल्यामुळे राजकीय रंगत वाढू लागली आहे. अनेक गावांत तर मतदारांचा कौल स्पष्ट होत नसल्याने निवडणुकीत चुरस वाढण्यासोबतच इच्छुकांच्या हृदयाचे ठोके वाढविणारी ठरते आहे. दुसरीकडे अखेरच्या दिवसापर्यंत प्रचाराचा आलेख चढता ठेवण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींची धावपळ होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.
हेही वाचा: इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....
छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेनंतर सुमारे दहा दिवसांचा कालावधी उमेदवारांना प्रचारासाठी अन् मतदारांना विचार करण्यासाठी मिळाला आहे. मात्र हा कालावधी उमेदवारांवर वातावरण टिकविण्याचा ‘दबाव’, तर मतदारांना मिरवून घेण्यासाठी ‘रुबाब’ वाढविणारा ठरणार आहे. अनेक गावांमध्ये रिंगणातील उमेदवार मागील काळात केलेली विकासकामे सांगून मते मागत आहेत, तर काहींनी परिवर्तन होणे आवश्यक असल्याचे सांगत मतदारांना साद घालणे पसंत केले आहे.
काही गावांतील नवख्या इच्छुकांनी मात्र परंपरागत सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही नको म्हणत नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी, असा सूर घेतला आहे. या सर्व राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या धुरळ्यात मतदारांचे पक्के मनोरंजन होणार असल्याचे जाणकार सांगत आहेत. यातही दर पाच वर्षांनी येणारी निवडणूक म्हणजे काही दिवस होणारी ‘दिवाळी’ समजून ‘जेवणावळी’चा मिळेल तेथून आस्वाद घेणाऱ्यांची ही संख्या गावागावांत असल्याने, त्यांचे चोचले पुरविणे उमेदवारांना ऐन थंडीत ‘घाम’ फोडणारे ठरते आहे.
गावविकासाशी काहीही देणंघेणं नसलेल्या अशा मतदारांच्या पोटाची तृप्ती ही मतदान यंत्रावर ठेवल्या जाणाऱ्या बोटातून दिसणार असल्यामुळे अशा लहरी मतदारांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागते आहे. असे असले तरी सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करून पाच वर्षांसारख्या दीर्घकाळासाठी निवडून दिले जाणारे गावकारभारी गावविकासाचा संकल्प हाती घेत, ग्रामस्थांचा सहभाग नोंदवत, गावाचा सर्वांगीण-समतोल विकासासाठी झटणारा असावा.
वारसा नसला तरी जनसेवेचा आरसा असणारा हवा. अशी अपेक्षाही सुज्ञ आणि जाणकार मतदारांची तसेच गावाच्या विकासासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या युवा वर्गाची असल्याचाही एक विधायक विचारप्रवाह यानिमित्ताने समोर येतोय. ही बाब सुदृढ लोकशाहीसाठी निश्चितच गरजेची ठरणार आहे! अर्थातच कोणत्या उमेदवारांचा प्रचाराचा फंडा मतदारांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला हे जाणण्यासाठी प्रत्यक्ष निकालाची वाट पाहावी लागणार हे नक्कीच.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.