कापडणे (धुळे) : पुणे जिल्ह्यातील एका कंपनीने शेतकऱ्यांना विकलेली केळीची उती संवर्धित रोपे खराब निघाल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कंपनीविरोधात तक्रार केली असून ग्राहक न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती कंपनीचे ग्राहक व शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष अनिल चव्हण व धुळे जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी यांनी दिली.
२०२०-२१च्या हंगामात अनेक शेतकऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील एका कंपनीकडून उती संवर्धित (टिश्यू कल्चर) रोपे विकत घेतली होती. मोठ्या आकाराची, गोड, मजबूत बुंध्याची निर्तायक्षम केळीची रोपे असल्याची कंपनीने खात्री दिली होती. पिक पुर्ण होईपर्यंत खते मशागत व पीक संरक्षणाबाबत संपूर्ण मार्गदर्शन कंपनीने केले. असे असताना प्रत्यक्षात फळे लहान आकाराची आली. झाडे खूप उंच वाढली व कमजोर बुंध्यामुळे केळीची झाडे मोडू लागली. बाजारात इतर केळींपेक्षा अर्ध्या किमतीलाही केळी विकणे मुश्कील झाले. राज्याच्या विविध जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांना या सदोष रोपांमुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.
खरबुजच्या रोपांमध्येही फसवणूक
चव्हाण यांनी इतर शेतकऱ्यांना सोबत घेत कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून पिकाच्या पंचनाम्याची मागणी केली आहे. केळीबरोबरच या कंपनीकडून खरबुजाची रोपे घेणाऱ्या शेतकऱ्यांची ही अशीच फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
दखल घेत पंचनामे
चव्हाण यांच्या तक्रारीची दखल घेत, कृषी विभागाच्या तज्ञ पथकाने केळी व खरबूज या पिकांची सदोष रोपे व बियाण्यांपासून तयार झालेल्या पिकांची समक्ष पाहणी करून पंचनामे केले. पाहणी करणाऱ्या तज्ञ समितीचा अहवाल प्राप्त होताच नुकसान भरपाईसाठी त्या कंपनीविरोधात ग्राहक न्यायालयात दाद मागणार आहे. तसेच खानदेशात ज्या शेतकऱ्यांची अशी फसवणूक झाली असेल, त्यांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रघुवंशी, माजी जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील, शांतूभाई पटेल, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वाणी, नारायण माळी यांनी केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.