अखंडित सेवेसाठी स्वेच्छानिवृत्तांचा मदतीचा हात! 

bsnl
bsnl

जळगाव : सध्याच्या शासनाच्या निर्णयामुळे "बीएसएनएल'च्या पन्नास वर्षांवरील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेऊन घरी जावे लागले. यात सुमारे पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक कर्मचारीवर्ग कमी झाला आणि अशा विषम परिस्थितीत थोड्याशा कर्मचाऱ्यांवर विभागाने उभे राहणे कसे शक्‍य असेल? याची जाणीव ठेवून आपापल्या विभागाबद्दलची आपुलकी, जिव्हाळा जपून इथले काही कर्मचारी निवृत्त अथवा स्वेच्छानिवृत्ती घेतली असली, तरी ते उन्हातान्हात, नदी- नाल्यांमध्ये तुटलेल्या केबल जोडायचे काम विनामूल्य करीत आहेत. 
शासकीय कर्मचारी म्हटलं, की आळशी, कामाची टाळाटाळ करणारे; किंबहुना लाचखोर, अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते; परंतु आपल्या विभागाला, आपल्या विभागाला केवळ ड्यूटीवर असतानाच नाही, तर सेवानिवृत्त झाल्यानंतरही आपल्या पोटच्या पोराप्रमाणे माया लावणारे, त्याला आपल्या स्वतःच्या घराप्रमाणे जपणारे, त्याची काळजी घेणारे कर्मचारीसुद्धा आहेत. असाच काहीसा अनुभव सध्या पाहायला मिळतोय, तो भारतीय दूरसंचार निगम अर्थात "बीएसएनएल'च्या स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत. वाढती स्पर्धा, शासकीय धोरणे, तांत्रिक अडचणी आणि मंदीचा फटका सहन करत देशातील सर्वांत मोठी सरकारी टेलिकॉम कंपनी "बीएसएनएल' ही कशीबशी स्वतःला सावरून उभी राहण्याचा प्रयत्न करीत आहे, तो आपल्या कर्तव्यकठोर कर्मचारीवर्गाच्या बळावर. 
जळगाव शहरात "अमृत' योजनेसह विविध विकासकामांसाठी खोदकाम सुरू आहे. परिणामी, अनेक ठिकाणी केबल तुटते आणि सर्व दूरसंचार यंत्रणा कोसळते. याच केबलच्या माध्यमातून सर्व दूरसंचार कार्यालये एकमेकांना जोडलेली आहेत. ज्यामुळे सर्व महत्त्वाचे विभाग, पोलिस यंत्रणा, बॅंका, व्यापारी प्रतिष्ठाने एकमेकांना जोडलेली आहेत. "बीएसएनएल'च्या सेवेच्या माध्यमातून या सर्व संस्था- आस्थापना- व्यापारी प्रतिष्ठाने आपापले कार्य सुरळीतपणे पार पाडत आहेत. मात्र, केबलच्या सततच्या तुटण्याने या सर्व सेवा खंडित होत आहेत. परिणामी, विभागाचे नावही जनमानसांत खराब होत आहे. हे सर्व होऊ नये आणि आपापल्या विभागाकडून सर्व जनतेला अबाधित सेवा देण्यासाठी इथला अधिकारी आणि कर्मचारीवर्ग सध्या सतत झटत आहे. त्यांच्या दिमतीला आता कुठलाही मोबदला न घेता काही स्वेच्छानिवृत्त कर्मचारीदेखील सेवा देत आहेत. 
 
स्वेच्छानिवृत्तांनी जपली बांधिलकी! 
शासनाच्या निर्णयामुळे "बीएसएनएल'चे सर्व विभाग ओस पडले आहेत. स्वेच्छानिवृत्ती अथवा निवृत्त झाल्याने सुमारे पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक कर्मचारी कमी झाले आहेत. परिणामी, अपुऱ्या मनुष्यबळामुळे सेवा देण्यात अडचणी निर्माण होतात. याची जाणीव ठेवून आपापल्या विभागाबद्दलची आपुलकी, जिव्हाळा जपून इथला कर्मचारीवर्ग निवृत्त अथवा कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असली, तरी ते उन्हातान्हात, नदी- नाल्यांमध्ये तुटलेल्या केबल जोडायचे काम विनामूल्य करीत आहेत. कुणी कार्यालयात कामात मदत करीत आहेत. तेही गेल्या दोन महिन्यांचा पगार न झालेला असताना. कुठल्याही प्रकारे "पेन्शन सेटल' झालेले नसतानाही, ते अहोरात्र कंपनीला वैभव प्राप्त करण्यासह देशभरातील नागरिकांना सेवा अखंडित मिळण्यासाठी झटत आहेत. 
 
कंपनीला गतवैभव मिळण्यासाठी तसेच देशभरातील नागरिकांना अखंडितपणे सेवा देण्यासाठी आपुलकी, जिव्हाळा जपून निवृत्त झालेले कर्मचारी, तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कर्मचारी- अधिकारी उन्हातान्हात, नदी- नाल्यांमध्ये तुटलेल्या केबल जोडायचे काम विनामूल्य करीत आहेत. 
- परेश सननसे, वरिष्ठ हिंदी अनुवादक, "बीएसएनएल', जळगाव 
 
"बीएसएनएल'मधून देशभरातून सुमारे 78 हजार 569 कर्मचारी, अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. महाराष्ट्रातून आठ हजार 544, तर जळगाव जिल्ह्यातून 575 पैकी 399 हून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. स्वेच्छानिवृत्ती घेतलेले काही कर्मचारी अजूनही कोणताही मोबाइला न घेतला काम करीत आहेत. ही नक्कीच प्रशंसनीय बाब आहे. 
- संजयकुमार केशरवानी, महाप्रबंधक, "बीएसएनएल,' जळगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com