जीवनावश्‍यक वस्तूंचे दुकाने रात्री 11 पर्यंत उघडी राहणार : जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे

collector corona
collector corona

जळगाव : लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्‍यक वस्तू तातडीने उपलब्ध व्हाव्यात. याकरिता जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. काही ठिकाणी दुकाने ठरावीक वेळेतच उघडी असतात. अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापुढे अशा तक्रारी येणार नाही याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज येथे संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिकेचे आयुक्त सुशील कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्‍याम लोही, रेल्वे पोलिस फोर्सचे कमांडट बी. पी. कुशवाह, मध्य रेल्वेच्या भुसावळ व जळगाव येथील स्टेशनमास्तर, सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. 

शिवभोजन केंद्रातून भोजन पॅकेट द्या 
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यातील कोणीही नागरिक उपाशी राहू नये, याकरिता जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज आहे. ज्या नागरिकांचा उदरनिर्वाह दैनंदिन कामकाजावरच अवलंबून आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार बुडत असल्याने ज्यांना जेवण मिळण्यात अडचणी येत आहे. ज्या गरीब व गरजू नागरिकांचा रोजगार बुडत आहे. त्यांना जेवण मिळणे आवश्‍यक आहे याकरिता सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. शिवभोजन थाळी केंद्रामधून जेवणाचे पॅकेट उपलब्ध करून द्यावीत. जिल्ह्यात 700 थाळींचे उद्दिष्ट आहे आवश्‍यकता भासली तर त्यात वाढ करण्यात येईल. अशा नागरिकांना सामाजिक संस्थांच्या मदतीने फुडपॉकेट देण्याचे नियोजन पुरवठा शाखेने करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 
 
पास देण्यासाठी विशेष कक्ष 
जिल्हाधिकारी म्हणाले की, काही ठिकाणी अत्यावश्‍यक सेवेची वाहने व ऍम्बुलन्समधून माणसांची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी येत आहे. परिवहन, पोलिस विभागाने दक्षता घ्यावी. जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना परिवहन कार्यालयामार्फत पास देण्यात येत आहे. यासाठी परिवहन कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचा संपर्क क्रमांक 0257-2261819 असा आहे. ज्यांना कोणाला याबाबत काही अडचण असेल अशा नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा. 

जादा दराने विक्रीची तक्रार द्या... 
जिल्ह्यातील शेतमाल विक्रीसाठी बाहेर नेणाऱ्या वाहनांना तसेच जीवनावश्‍यक वस्तू घेऊन जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांना कुठल्याही प्रकारची अडचण येता कामा नये. अन्नधान्याच्या तसेच भाजीपाला, फळे जादा भावाने विक्री होत असल्यास याबाबतची तक्रार जिल्हा पुरवठा शाखेकडे तर औषधांबाबतची तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे करावी. संबंधित विभागाने आपल्याकडे आलेल्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. 

वापरलेल्या मास्कबाबत काळजी घ्यावी 
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक मास्कचा वापर करीत आहे. परंतु वापरलेले मास्क रस्त्यावर टाकल्याचे दिसून येत आहे. या विषाणूंचा संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी वापरलेले मास्क रस्त्यावर टाकू नये. सदरचे मास्क घंटागाडीतच द्यावे. महापालिकेने त्याची स्वतंत्र विल्हेवाट लावावी. जेणेकरून त्यापासून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही. 

ओळखपत्र गळयात घाला 
संचारबंदीत जीवनावश्‍यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. या सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी, शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी घराबाहेर पडतानाच आपले ओळखपत्र गळयात अडकवूनच बाहेर पडावे. जेणेकरून पोलिसांना तपासणी करताना अडचणी येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com