Union Budget 2020 : जगाच्या स्पर्धेत विद्यार्थी टिकविणारी शिक्षण प्रणाली हवी 

education budget
education budget

जळगाव : सरकारने शैक्षणिक धोरणात बदल करत असताना ते केवळ विद्यार्थी नव्हे तर राष्ट्राचा जबाबदार नागरिक घडेल, अशा स्वरूपाचे असावे. कोणत्याही शाखेचा अभ्यासक्रम बदलताना, अथवा नव्याने विकसित करताना त्यात व्यवसायाभिमुख, सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विचार व्हायला हवा. विकास साधताना संस्कारांचे धडेही विद्यार्थ्याला मिळाले पाहिजे, त्यासाठीही सरकारच्या शैक्षणिक धोरणात बदल करणे आवश्‍यक आहे. केवळ गुणांच्या मागे न लागता प्रात्यक्षिकांवर भर देत विद्यार्थ्यांना जगाच्या स्पर्धेत टिकता येईल, अशी शिक्षण प्रणाली आवश्‍यक आहे.. अर्थात, या सर्व गोष्टींसाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद असावी.. अशा विविध प्रतिक्रिया महाविद्यालयीन तरुणांनी व्यक्त केल्या. 
 
नागरिक घडवणारे शिक्षण हवे 
माधुरी पाटील (बेंडाळे महिला महाविद्यालय)
: समाजातील विविध घटकांना समोर ठेवून नवीन धोरण अमलात आणावे. व्यावसायिक युवक बनेल, यासाठी प्रयत्न असावेत. एकविसाव्या शतकाला समर्थपणे तोंड देणारी पिढी तयार करणे तसेच युवा वर्ग संस्कारक्षम कसा बनेल, यासाठी अभ्यासक्रमात उपाय केले पाहिजेत. शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या सक्षम युवक घडेल, याचा विचारही नव्या शैक्षणिक धोरणात अपेक्षित आहे. 
 
वास्तववादी अभ्यासक्रम हवा 
युगंधरा निकम (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव)
: जगाच्या स्पर्धेत भारतीय युवक मागे पडायला नको, भारतात शिक्षण तसे मिळायला हवे. विदेशात शिक्षण जे मिळते त्यापेक्षा भारतात चांगले कसे देऊ, हा विचार हवा. चालू घडामोडींचा अभ्यासक्रमात सहभाग असावा, तसेच वास्तववादी अभ्यासक्रम असावा. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहण्यासाठी खेळ, योगासने यांचा समावेश अभ्यासक्रमात असावा. 
 
कमी खर्चात चांगले शिक्षण हवे 
उज्ज्वल झा (रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय)
: शिक्षण प्रत्येकाला मिळायला हवे. कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. अभ्यासक्रम वेळोवेळी बदलायला हवा. गरजा ओळखून अभ्यासक्रम निश्‍चित करावा. भारतातील युवकांनी भारतात शिक्षण घेऊन भारतातच सेवा करावी, असा कायदा करावा. मराठी शाळा सक्षम करून ग्रामीण भागात शिक्षणाबाबत ग्रामीण भागात अधिक प्रभावीपणे जनजागृती केली पाहिजे. 

शिक्षक नियुक्ती राज्यसेवेमार्फत करावी 
यशस्वी गिऱ्हे (त्रिमूर्ती फार्मसी महाविद्यालय)
: विद्यार्थी घडवायचा असेल तर त्याला घडवणारे गुरुजन सक्षम असायला हवेत. विद्यार्थ्यांना पडलेल्या शंका शिक्षकांना सोडवता यायला हव्यात. त्यासाठी शिक्षकांची नियुक्ती राज्यसेवेमार्फत व्हावी. विद्यार्थ्यांचा कल ओळखून शिक्षण द्यायला हवे. विद्यार्थ्यांना कागदी सक्षम बनविण्यापेक्षा सामाजिक अंगाने समतोल बनवायला हवे. प्रात्यक्षिकात तो अव्वल असला पाहिजे. तेव्हा भारत जगाच्या तुलनेत सक्षम बनेल. 
 
तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा 
यज्ञेश पाटील (डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय)
: अभ्यासक्रम आता कागदाच्या पलीकडे गेला पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर अधिक करावा. विद्यार्थी परीक्षार्थी न बनता ज्ञानार्थी बनायला हवा. पुस्तकाच्या पलीकडे वाटचाल करणे महत्त्वाचे आहे. प्रात्यक्षिकाला अभ्यासक्रमात अधिक स्थान मिळायला हवे. कौशल्याभिमुख ज्ञानाच्या बळावर जीवनमान सुधारण्याजोगे शिक्षण हवे. तसेच संस्कृती अबाधित राहण्यासाठीच्या घटकांचा अभ्यासक्रमात समावेश असावा. 

संस्कारक्षम अभ्यासाची गरज 
अक्षय सुनसकर (केसीई अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव)
: संस्काराची मूल्य जोपासणारा अभ्यासक्रम असायला हवा. देशात प्रगती करत असताना संस्कारांना तिलांजली देण्यात येतेय. प्रगती झाली पाहिजे, पण त्यात संस्कार देखील महत्त्वाचे आहेत. वेळोवेळी अभ्यासक्रम बदलायला हवा. परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासक्रम न देता भविष्यात चांगला युवक घडेल, असा अभ्यासक्रम असावा. परिवर्तनवादी युवक घडला पाहिजे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com