शिक्षेमुळे ठेवीदारांच्या रकमा व्याजासह परत

jago grahak jago
jago grahak jago

जळगाव : गेल्या काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील बहुतांश पतसंस्था डबघाईस आल्या. यामध्ये हजारो ठेवीदारांच्या ठेवी संचालक मंडळाकडून हडप केल्या गेल्या. या प्रकारासंदर्भात ठेवीदारांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रारी दाखल केल्या. या ठिकाणी जलद गतीने खटला चालविल्यानंतर ग्राहक मंचातर्फे आतापर्यंत 35 प्रकरणांमध्ये सर्व संचालकांना तीन वर्षांची शिक्षा ठोठावली असून, संपूर्ण राज्यभरात पहिल्यांदाच ठेवीदारांच्या बाजूने निर्णय देण्यात आला आहे. 
ग्राहकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जिल्हा ग्राहक मंचाची स्थापना करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात सर्वच क्षेत्रांतील सर्वाधिक तक्रारींबाबत व त्या निकाली काढण्यासंदर्भात जळगाव जिल्हा अव्वल स्थानी आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी पतसंस्थांनी ठेवीदारांची रक्कम घेऊन त्यांनी दिवाळे काढल्याने जळगाव जिल्ह्याचे नाव संपूर्ण राज्यात गाजले. ठेवीदारांनी संबंधित बॅंकांच्या संचालक व अध्यक्षांविरुद्ध ग्राहक न्यायालयात खटला दाखल केला. ग्राहक मंचाने हा खटला जलद गतीने सुरू ठेवला. यातील सुमारे 35 प्रकरणांमध्ये संबंधित पतसंस्थांच्या संचालकांना दोषी ठरवत त्यांना तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. संचालकांनी शिक्षेपोटी ठेवीदारांची रक्कम त्यांना व्याजासह परत केली. तसेच सुमारे 80 प्रकरणांमध्ये संचालकांनी तडजोड करून ठेवीदारांच्या ठेवी त्यांना परत केल्या असून, 80 लाख रुपये वसुलीही ग्राहक मंचातर्फे करण्यात आली. तसेच शिक्षा झालेल्या संचालकांनी ठेवीदारांची रक्कम व्याजासह परत केल्याने मंचातर्फे त्यांना दोषमुक्त करण्यात आले. 

त्रिसदस्यीय समितीकडून निकाल 
ग्राहक मंचात दाखल होणाऱ्या तक्रारी 90 दिवसांत निकाली काढल्या जातात. ग्राहक मंचाच्या अध्यक्षा वीणा वाणी, सदस्या पूनम मलिक व सुरेश जाधव या त्रिसदस्यीय समितीकडून ग्राहक मंचात दाखल होणाऱ्या तक्रारी निकाली काढल्या जातात. या समितीने ठेवीदारांच्या बाजूने निर्णय देऊन संचालक मंडळाला शिक्षा ठोठावल्याने संपूर्ण राज्यात जळगावातील मंचातर्फे इतका मोठा निर्णय देण्यात आला आहे. 

एक कोटीपर्यंतचे खटले शक्‍य 
ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल करताना तक्रारदाराकडून पाच लाखांपर्यंतच्या तक्रारीची स्टॅम्प ड्युटी आकारली जात नाही. तसेच 20 लाखांपर्यंतची तक्रार जिल्हा ग्राहक मंचामध्ये दाखल करता येत असून, नवीन कायद्यान्वये त्यामध्ये वाढ करून एक कोटी रकमेपर्यंतचे सर्व खटले जिल्हा ग्राहक मंचामध्ये दाखल करता येणार आहेत. 

वर्षभरात 504 खटले निकाली 
जिल्हा ग्राहक मंचात 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत सर्वच क्षेत्रांतील सुमारे 545 खटले दाखल करण्यात आले. पैकी सुमारे 504 खटले निकाली निघाले असून, उर्वरित खटलेही निकाली निघण्याच्या मार्गावर आहेत.राज्यात 

पतसंस्थांच्या तक्रारी प्रलंबित 
ग्राहक मंच स्थापन झाल्यापासून विविध क्षेत्रांतील सुमारे 1044 तक्रारी प्रलंबित आहेत. यामध्ये बॅंक- 77, रेल्वे- 14, एअरलाइन्स-2, इन्शुरन्स-281, टेलिकॉम- 32, प्रायव्हेट सोसायटी ऍन्ड बिल्डर्स- 33, मेडिकल निग्लीगेन्स-27, इलेक्‍ट्रिसिटी- 76, डिफेक्‍टिव्ह हाऊस होल्ड गुड्‌स-2, एज्युकेशन-4, रोड ट्रान्स्पोर्ट- 54, सीड- 99, क्रेडिट सोसायटी- 276, इन्व्हेसमेंट- 74, गॅस-6 अशा एकूण 1044 तक्रारी निकाली काढण्याचे काम सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com