पुनर्तपासणीत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे गुण "जैसे थे'; अनेकांची तक्रार

vidhypith
vidhypith

जळगाव : गेल्या वर्षी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये झालेल्या "अभियांत्रिकी'च्या तृतीय वर्षाच्या परीक्षेतील गुणांबाबत ज्या विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी अर्ज केले, त्यांना त्यांच्या गुणांबाबत "नो चेंज'चा "मेसेज' आला आहे. त्यामुळे पडताळणी न होताच गुण कायम ठेवल्याची तक्रार त्या विद्यार्थ्यांनी केली आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून, विद्यापीठ प्रशासनाने दखल घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी तक्रारीद्वारे केली आहे. 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे गतवर्षी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये "अभियांत्रिकी'च्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची सातव्या सत्रातील परीक्षा घेण्यात आली. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिल्यानंतर फेब्रुवारीअखेरीस त्याचा निकाल आला. मात्र, काही विद्यार्थ्यांना गुणांबाबत शंका असल्याने त्यांनी मार्चमध्ये त्या विषयांच्या गुणांच्या पडताळणीसाठी पुनर्तपासणीचा अर्ज भरून दिला. 

गुण "जैसे थे' 
ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत शंका होती, अशा सर्वांनी विद्यापीठाकडे अर्ज केले. मात्र, त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे गुण पडताळणीनंतरही तेवढेच असल्याची नोंद विद्यापीठाने केली आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी आता यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. मार्चमध्ये "कोरोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर "लॉकडाउन' लागू झाल्यानंतर विद्यापीठातही संबंधित कर्मचारीवर्गाच्या उपस्थितीवर मर्यादा आल्या. त्यामुळे पेपरची पडताळणी न करताच गुण देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. 
 
दरवर्षी वाढतात गुण 
अशाप्रकारे पुनर्तपासणी केल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांचे गुण वाढत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. असे असताना यावेळी मात्र पडताळणीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना उत्तरादाखल आलेल्या "पीडएफ'मध्ये "नो चेंज'चा "मेसेज' आला आहे. पडताळणी न करताच काही विद्यार्थ्यांना तेवढेच गुण कायम करण्यात आल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याची तक्रार आहे.  

अशी आहे पुनर्तपासणीची पद्धत 
पेपर पुनर्तपासणी व पडताळणीची विशिष्ट पद्धत आहे. दोन टप्प्यांतील या प्रक्रियेत एकतर गुणांच्या एकूण बेरजेत काही त्रुटी असतील, तर त्या दूर केल्या जातात, दुसऱ्या टप्प्यात संबंधित नमुना अर्जात नमूद असेल, तर विद्यार्थ्याला त्याच्या उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी देऊन पडताळणी केली जाते. त्यात गुण वाढण्याची विद्यार्थ्याला खात्री असली, तर तो तसा दावा करू शकतो. त्यानंतर त्या पेपरची तपासणी होऊन निर्णय घेतला जातो. 


 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com