आठ हजार ऊसतोड अडकले परजिल्ह्यात

ustod kamgar
ustod kamgar

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : सध्याच्या ‘लॉकडाऊन’च्या काळात राज्यातील साखर कारखान्यांसह इतर सर्वच कारखाने बंद आहेत. त्यामुळे या कारखान्यांवर रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील सुमारे आठ हजारांहून अधिक ऊसतोड मजूर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अडकून पडले आहेत. या मजुरांना आपल्या तांड्यांवर येण्यासाठी प्रशासनाने व्यवस्था करावी, अशी मागणी येथील शेतकरी बचाव कृती समितीचे भीमराव जाधव यांनी केली आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ‘लॉकडाऊन’ केल्याने सर्वच ठिकाणचे कारखाने बंद आहेत. यंदाच्या हंगामात उसाचा तुटवडा असल्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच साखर कारखान्यांचे हंगाम संपले आहेत. सुमारे पाच महिन्यांपासून तालुक्यातील मोठ्या संख्येने बंजारा समाजाचे ऊसतोड कामगार परजिल्ह्यात सद्यःस्थितीत असून या सर्वांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. सध्या जिल्हाबंदी असल्याने वाहतुकही बंद पडली आहे. बाहेरगावी असलेल्या ऊसतोड मजुरांना कारखान्यावरच थांबून राहावे लागत आहेत. या मजुरांसह त्यांच्या कुटुंबीयांना कारखाना व्यवस्थापनाने अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. या सर्व ऊसतोड मजुरांकडे पुरेसा अन्नधान्याचा साठा जवळ नाही. आतापर्यंत मिळणारी मजुरी व उसाच्या पेंढ्या (चारा) विकून त्यावर त्यांची गुजराण होत होती. कारखान्यांचे गाळप संपल्यानंतर या कामगारांना तांड्यावर येण्याचे वेध लागतात. सध्या या मजुरांना गावी येण्यासाठी कुठलेही वाहन मिळत नसल्याने ऊसतोड मजुरांचे मुकादम देखील हतबल झाले आहेत. 

लोकप्रतिनिधींना निवेदन 
राज्यातील सांगली, सातारा, पुणेसह इतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप संपले आहेत. त्यामुळे या कारखान्यांवर गेलेले तालुक्यातील ऊसतोड मजूर आता आपल्या गावी येण्यासाठी धडपड करीत आहेत. हे मजूर त्यांच्या नातेवाइकांना फोन करून आपबिती सांगत असून आमची येण्याची काही तरी व्यवस्था करावी, अशी मागणी करीत आहेत. या संदर्भात शेतकरी बचाव कृती समितीचे भीमराव जाधव यांनी खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांना निवेदन देऊन तालुक्यातील ऊसतोड मजुरांना आपल्या गावी सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. 

सुरतमधील कामगार परतले 
सुरत येथील एका खाजगी कंपनीत तालुक्यातील बंजारा समाजाचे ११ कुटुंबीय रोजंदारीसाठी कामाला होते. या संदर्भात बंजारा क्रांतिदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश जाधव यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे कैफियत मांडली. त्यानुसार महाराष्ट्र पोलिसांनी सुरत पोलिसांशी संपर्क साधून बंजारा समाजाच्या कुटुंबीयांना चाळीसगाव तालुक्यातील तांड्यावर जाण्यासाठी खासगी वाहनांची व्यवस्था करून दिली. त्यानुसार ११ कुटुंबातील जवळपास ६१ जण तीन दिवसांपूर्वीच आपापल्या तांड्यांवर सुखरूप पोहोचले. 

आमदारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा 
आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. तालुक्यातील ऊसतोड मजुरांना आपल्या गावी सुखरूप पोहचते करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची लवकरच रितसर परवानगी घेतली जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व ऊसतोड कामगार व त्यांचे कुटुंबीय आपापल्या तांड्यावर लवकरच येतील, असे आमदार चव्हाण यांनी आपल्याला सांगितल्याचे भीमराव जाधव यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com