"लॉकडाऊन'चा फटका..."मोबाईल'ची चार कोटींची उलाढाल ठप्प 

mobil marke
mobil marke

जळगाव ः "कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात 21 दिवस "लॉकडाऊन' करण्यात आला आहे. या काळात सर्व व्यवहार ठप्प झाले असून, शहरातील मोबाईल मार्केटला याचा मोठा फटका बसला आहे. एकट्या जळगाव शहरात या क्षेत्राचे आतापर्यंत सुमारे चार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अजून येत्या आठ दिवसांत नुकसानीचा हा आकडा सहा कोटींच्या पुढे जाण्याची शक्‍यता आहे. 

शहरातील गोलाणी व्यापारी संकुल हे मोबाईलचे मार्केट असल्याने या ठिकाणी सर्वाधिक म्हणजेच सुमारे 300 पेक्षा अधिक मोबाईलची दुकाने आहे. यामध्ये 130 दुकाने ही मोबाईल विक्रीची असून, उर्वरित दुकाने दुरुस्ती व ऍसेसरीजची आहे. एरवी या मार्केटमध्ये दिवसभरात लाखो रुपयांची उलाढाल होत असून, संपूर्ण जिल्हाभरातून नागरिक मोबाईल खरेदीसाठी या ठिकाणी येत असतात. तथापि, संपूर्ण देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे गेल्या 12 दिवसांपासून संपूर्ण व्यवसाय, व्यवहार ठप्प झाले आहेत. मोबाईलच्या विक्रीसह सर्व ऍसेसरीजची दुकाने देखील बंद आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत मोबाईल विक्रेत्यांचे सुमारे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, इतके दिवस आपले व्यवहार बंद ठेवल्याची ही आतापर्यंतची पहिलीच वेळ आहे. 

कारागिरांची बिकट परिस्थिती 
गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल विक्रीसह दुरुस्ती, स्पेअरपार्ट व ऍसेसरीजची अनेक दुकाने आहेत. या मार्केटमध्ये दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होत असते. तसेच मोबाईल दुरुस्ती करणाऱ्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या दुरुस्तीवर असून, आता गेल्या 12 दिवसांपासून संपूर्ण व्यवहार ठप्प असल्याने त्यांचा पोटापाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

मंदीच्या लाटेची शक्‍यता 
अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे आताच्या काळात मोबाईल देखील दैनंदिन गरजेची वस्तू बनली आहे. काही जण मोबाईल हा हौस म्हणून बदलवत असतात. दरम्यान, लॉकडाऊनमुळे मोबाईलच्या व्यवहारात आतापर्यंत आलेली सर्वांत मोठी मंदी यापुढे निर्माण होण्याची शक्‍यता आहे. तसे झालेच तर मोबाईल मार्केटमधील मंदी ही वर्षभरानंतर देखील सुरळीत होणार नसल्याची भीती व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. 


कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोबाईल मार्केटमध्ये सर्वांत मोठी मंदीची लाट येण्याची चिन्हे दिसून येत आहेत. हा "बॅकलॉग' भरून काढण्यासाठी पुढील सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लागू शकतो. मोबाईल गरजेची वस्तू आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे ग्राहकांकडे पैसा नसल्यामुळे मोबाईल मार्केटवर त्याचा परिणाम होण्याची शक्‍यता अधिक आहे. 
- दीपक कुकरेजा, संचालक, श्रीसाई सागर मोबाईल, 

लॉकडाऊनमुळे मोबाईल मार्केटची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. दुकान भाड्यापासून ते दुकानावर काम करणाऱ्यांचे पगार देण्यापर्यंतची समस्या व्यावसायिकांना भेडसावू लागली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक युवकांवर बेरोजगार होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. मार्केट सुरळीत झाल्यानंतर देखील या व्यवसायात मंदी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 
- वाल्मीक पाटील, संचालक, महालक्ष्मी मोबाईल एनएक्‍स. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com