शेतकरी पीक विमा, फळविक्री धान्य विक्रीला परवानगी द्या : कविवर्य ना. धों. महानोर 

mahanor
mahanor

वाकोद (ता. जामनेर) ः "सूर्य नारायणा नित्य नेमाने उगवा अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा...' या उक्तीप्रमाणे आज नुसता महाराष्ट्रावर नाही तर संपूर्ण जगावर मोठे संकट आहे. ज्यात सर्वजण भरडले जात आहोत. तो काळोख दूर व्हावा सूर्यनारायणाने नित्यनेमाने उगावे अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा... असे संदेश या पद्धतीतून मांडण्याचा प्रयत्न कविवर्य महानोर यांनी आपल्या प्रकट मुलाखतीमध्ये मांडला. त्यांनी एकंदरीत शेतकऱ्यांची खंत या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न केला असून महाराष्ट्र सरकारला माझ्या अन्नदात्याला जगवा त्याचा पीक विमा असेल, फळ, धान्य असेल त्याला बाहेर मार्केट उपलब्ध करून द्या; त्याला विकण्याची मुभा द्या असे आवाहन कविवर्य महानोर यांनी मुलाखतीतून केले आहे. 

प्रत्येक गोष्टीला अंत आहे 
कोरोना हे एक युद्ध असून या युद्धातून समाज उभा राहिला पाहिजे असल्याचे म्हणत महानोर यांनी हे संकट खूप मोठे आहे. ज्या पद्धतीने या विषाणूचा प्रसार होत आहे त्याच्या भीतीने माणसे कधी नव्हे ते पाखरासारखे घरी बसली आहे. आज कोरोना नाव दोन महिन्यांपासून सुरू असून ते पराकोटीचे अवगुंठन आहे. त्याला जगात उपाय सापडत नाही. विज्ञानाच्या युगामध्ये हा बिना अवयवाचा विषाणू हल्ला करत आहे. त्यावर उपाय न सापडणे हे सर्वांचे दुर्दैव आहे. बदलत्या काळात माणूस जवळ आला आहे. हे जगची माझे घर याप्रमाणे एकमेकांच्या सुख- दुःखात आदान प्रदान करून राष्ट्र मोठे करण्याचे काम प्रत्येक जण करतो आहे. पूर्ण जगाला हा विषाणू थकवतोय हे मोठे दुःख आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात प्रमाण कमी झाले असले, तरी खूप मोठे संकट आहे. प्रत्येक गोष्टीला ज्याप्रमाणे आरंभ आहे; त्याप्रमाणे शेवट सुद्धा आहे. 

घरातच बसा...शासनाचे काम चोख 
पंतप्रधानांपासून ते राज्य सरकारपर्यंत सर्वजण आपापल्यापरिने काम करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच शरद पवारांच्या मार्गदर्शन अशा सर्वपक्षीय लोक यांच्या समन्वयातून हे दुःख निराकरण करण्याचा डॉक्‍टर्स, नर्सेस, परिचारिका, औषध विक्रेते हे एका सैन्याप्रमाणे धाडसाने सामना करीत आहे. हे लोक माणसाच्या जगण्यासाठी काम करतायेत त्यांचे लाख धन्यवाद मानले पाहिजे. त्यांच्यासाठी "तळहाती शीर घेऊन ये दख्खनची सेना लढली' या उक्तीप्रमाणे आमचे सर्व सैनिक लढताहेत. त्याचबरोबर कायदा- सुव्यवस्था राखण्याचं काम पोलिस यंत्रणा करते म्हणून मी सर्व जनतेला आव्हान करेल. त्यांचे ऐका घरात बसा बाहेर निघु नका बाकी काम शासन निश्‍चितपणे चोख करत आहेत. 

शेतकऱ्यापुढे दुष्काराळानंतर कोरोना 
सध्याच्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोळ मंडली आहे. सर्वजण अस्वस्थ आहेत, त्यातून आपण लवकर उभे राहू शकत नाही. सत्तर टक्के लोक खेड्यात राहतात. तिथे माझा शेतकरी जमीन करतो. सध्या कमी पाण्यामध्ये रोखीचे पीक घेण्याचा प्रयत्न करतोय. आज त्याची पूर्ण पिके तयार होऊन शेतात उभी आहे. ती आणण्यासाठी त्यांच्याकडे व्यवस्था नाही, पैसा नाही, बॅंकेत व्यवहार करू शकत नाही. दोन वर्षांपूर्वी पाणी नव्हते; म्हणून दुष्काळ. मागील वर्षी अधिकचे पाणी होते म्हणून दुष्काळ. यावर्षी त्यातून सावरण्याचा माझा शेतकरी प्रयत्न करतोय, त्यात कोरोना संकटामुळे शेतकरी परेशान आहे. मका, ज्वारी, बाजरी, कापूस यासारखे माल घरात पडून आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी संकटात आहे. देणेकरांचे देणे आणि व्याज देऊ शकत नाही. त्याने आज काय करावे? त्याच्याकडे पैसा नाही त्याला माल बाहेर नेण्याची परवानगी नाही. म्हणून महाराष्ट्र शासनाने माझ्या शेतकऱ्याचा जो माल उघड्यावर पडला आहे. त्याला विकण्याची मुभा द्या. त्याचबरोबर व्यापाऱ्याने देखील संतुलित विचार करून शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य तो भाव देण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

वाचन करत घालवतो दिवस 
मनाला शांती व चालना देणारे एकमेव साधन म्हणजे पुस्तक. पुस्तक ज्ञान गीत आणि संगीत याशिवाय दुसरा मार्ग नाही. सध्याच्या लॉकडाउन कालावधीत पूर्णवेळ वाचन करुन वेळ घालवत असून एखादे पुस्तक वाचून झाल्यावर जेंव्हा कोरोना संदर्भात बातमी कळते, तर मन खिन्न होते. म्हणुन विज्ञानाच्या देवाला पुन्हा एकदा विनंती करेल की या काळोखातून सर्वांना बाहर काढ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com