‘मनरेगा’ : जिल्ह्यात तीन महिन्यांत कामांवर ४४ टक्के खर्च 

manarega
manarega

नंदुरबार : ‘लॉकडाउन’ काळात जिल्हा प्रशासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य दिल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत गेल्या तीन महिन्यांतच ४४ टक्के खर्च झाला असून, ४१ टक्के मनुष्य दिवस निर्मिती झाली आहे. 
‘मनरेगा’अंतर्गत अधिकाधिक मजुरांना काम देण्याच्या पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या सूचनेनुसार, प्रशासनाने गावपातळीवर सूक्ष्म नियोजन केले होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सातत्याने विविध यंत्रणांचा आढावा घेऊन कामास विशेष गती प्रदान केली आहे. या मोहिमेमुळे संकटाच्या परिस्थितीत ६० हजारांपेक्षा अधिक मजुरांना रोजगार मिळाला. 

‘मनरेगा’अंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात सुमारे ६६ कोटी ९५ लाखांपैकी अकुशल घटकांसाठी ५२ कोटी २५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आणि एकूण २५ लाख ३२ हजार मनुष्य दिवस निर्माण झाले होते. चालू आर्थिक वर्षात झालेल्या २९ कोटी ३० लाख खर्चापैकी २३ लाख ११ हजारांचा निधी अकुशल घटकांसाठी खर्च करण्यात आला असून, १० लाख ३७ हजार मनुष्य दिवस निर्माण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या मनुष्य दिवसाच्या तुलनेत या वर्षात ४१ टक्के मनुष्य दिवसनिर्मिती ही केवळ मागील तीन महिन्यांत साध्य करण्यात आली आहे; तर मागील वर्षीच्या तुलनेत ४४ टक्के खर्च केवळ मागील तीन महिन्यांच्या कालावधीत करण्यात आला आहे. यात सर्वाधिक खर्च अक्राणी तालुक्यात ६२ टक्के (पाच कोटी ४१ लाख) आणि नवापूर तालुक्यात ६१ टक्के (पाच कोटी २३ लाख) या दोन तालुक्यांनी केला आहे. या दोन तालुक्यांतील अनुक्रमे २.५८ लाख आणि २.२५ लाख मनुष्य दिवसाची निर्मिती केली आहे. 

‘कोरोना’ संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले असताना, अधिकाधिक मजुरांना काम देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. उन्हाळ्यात जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले होते. पावसाळ्यासाठी वृक्षारोपण, नर्सरी, फळझाडे लागवड आदी कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. ‘मनरेगा’च्या माध्यमातून गावाच्या विकासाची कामे व्हावीत, असेदेखील प्रयत्न करण्यात येत असून, त्यासाठी नागरिकांच्या प्रबोधनावरही भर दिला जात आहे. 
 
राज्यात नंदुरबारची चांगली कामगिरी! 
‘मनरेगा’च्या कामांत ग्रामपंचायत, वने, सामाजिक वनीकरण, कृषी आदी विभागांनी कामे हाती घेतली आहेत. ‘शेल्फ’वर ३२ हजार ३१ कामे उपलब्ध आहेत. ‘मागेल त्याला काम’ देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. अपूर्ण कामे पूर्ण करण्यात आणि मजुरी वेळेवर देण्यातही जिल्ह्याने राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com