उन्हाळ कांद्याच्या काढणीपर्यंत एकराचा खर्च पोचणार 35 हजारांपर्यंत 

residentional photo
residentional photo

नाशिक ः अवकाळी पावसाच्या धुडगुसामुळे राज्यातील उन्हाळ कांद्याची लागवड 60 टक्के शेतकऱ्यांना जानेवारीअखेरपर्यंत करावी लागेल. तसेच यापूर्वी तीन वेळा रोपे खराब झाल्याने एकराचा उत्पादन खर्च यंदा 35 हजारांपर्यंत पोचणार आहे. यंदा उन्हाळ कांद्याला अखेरच्या टप्प्यात चढा भाव मिळाल्याने गेल्या वर्षीपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवडीची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. प्रत्यक्षात मात्र रोपांसाठी बियाणे उपलब्ध न झाल्याने क्षेत्र "जैसे-थे' राहील असे दिसते. 

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकराला चार किलो म्हणजे, पायलीभर बियाणे लागते. पाचशे ते सहाशे रुपये किलो भावाने मिळणारे बियाणे अलीकडच्या काळात सोळाशे ते अठराशे रुपयांवरून दोन हजार 300 रुपयांपर्यंत पोचले आहे. शिवाय शेत तयार करणे, खते देणे, तणनाशक फवारणे अशा कारणांमुळे यंदाच्या उन्हाळ कांद्याच्या लागवड खर्चात 50 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. काही शेतकऱ्यांनी आता चौथ्यांदा रोपे तयार करण्यासाठी बियाणे टाकले आहे.

बियाणे उपलब्धतेची शक्यता धूसर

   नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बहुतांश लागवड होणाऱ्या उन्हाळ कांद्याच्या लागवडीचा हंगाम महिन्याभराने लांबणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी बियाणे तयार करण्यासाठी रोपांची लागवड करण्याऐवजी थेट उत्पादनासाठी बियाणे वापरले असताना भाव कडाडल्याने पुढील वर्षीच्या उन्हाळ कांद्यासाठी बियाणे उपलब्ध होण्याची शक्‍यता धूसर होणार आहे. दरम्यान, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये लागवड होऊन जानेवारीपासून बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या लेट खरिपाचे देशात उत्पादन 50 हजार टनांपर्यंत होते. महाराष्ट्राप्रमाणे मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये लेट खरिपाच्या रोपांचे नुकसान झाल्याने नवीन कांद्याच्या उत्पादनात दहा हजार टनांनी घट येण्याची चिन्हे दिसताहेत. परिणामी, नवीन कांद्याचा क्विंटलचा भाव 800 ते 1200 रुपयांपर्यंत राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

उत्पादन थंडीवर अवलंबून 
उन्हाळ कांद्याच्या लागवडीचा कालावधी अगोदर महिन्याने पुढे गेला. त्यामुळे आगामी थंडीवर उन्हाळ कांद्याचे अपेक्षित उत्पादन अवलंबून असेल. संक्रांतीनंतर थंडीचे प्रमाण कमी होण्यास सुरवात होते. हीच परिस्थिती कायम राहिल्यास उत्पादनात घट येण्याची भीती शेतकऱ्यांना वाटते आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार फेब्रुवारी 2020 अखेरपर्यंत थंडी राहिल्यास कांद्याचे अपेक्षित उत्पादन मिळू शकते. हवामानाच्या शक्‍यता गृहीत धरल्यास उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात 20 टक्‍क्‍यांनी घट येण्याचा अंदाज कृषितज्ज्ञांना वाटतो आहे. तसे घडल्यास देशात उन्हाळ कांद्याची आवक महिनाभर उशिरा होऊन सुरवातीपासून ग्राहकांना चढ्या भावाने कांदा खरेदी करावा लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 


महिन्याला लागतो 10 लाख क्विंटल कांदा 
उन्हाळ कांद्याचे देशामध्ये एक लाख टनांहून अधिक उत्पादन अपेक्षित असते. हा कांदा सहा ते सात महिने खाण्यासाठी वापरला जातो. महिन्याला देशातील ग्राहकांना दहा लाख क्विंटल कांद्याची आवश्‍यकता भासते. दहा टक्के कांदा सडतो. शिवाय तेवढेच नुकसान चाळीत साठविलेल्या कांद्याचे होते. ही सारी परिस्थिती पाहता, थंडीचे प्रमाण आगामी उन्हाळ कांद्याचे उत्पादन आणि ग्राहकांना मोजावे लागणारे पैसे याचे अर्थकारण निश्‍चित करणारे आहे. 


उन्हाळ कांद्यासाठीचे बियाणे महागले आहे. पंधरा दिवसांपूर्वी रोपांसाठी मी बियाणे टाकले आहे. मला मात्र अपेक्षित बियाणे मिळाले नसल्याने आणि आता मागूनही कुणी बियाणे देणार नसल्याने इच्छा असूनही उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करणे मला शक्‍य नाही. त्यामुळे कांद्याचे क्षेत्र गव्हाखाली नेण्याचा मी विचार करत आहे. 
-यशवंत पाटील, कांदा उत्पादक 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com