SAKAL EXCLUSIVE- खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे जागोजागी मृत्यूचे सापळे 

live
live

नाशिक ः जेमतेम पावसात मुंबई- आग्रा, नाशिक- पुणे, नाशिक- औरंगाबाद महामार्गाची चाळण झाली. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आरोग्याच्या समस्यांचा ठणक उठण्यासह वाहन दुरुस्ती अन्‌ पथकराचा भुर्दंड सहन करावा लागतो. जलद व सुरक्षित प्रवास सोडाच; पण महामार्गांवरील अनेक ठिकाणे मृत्यूचा सापळा बनले. 

मालेगाव ते इगतपुरीपर्यंत मुंबई- आग्रा महामार्गाने प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. 152 किलोमीटरपर्यंत अनेक ठिकाणी महामार्ग खड्डेमय आहे. त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहने दणादण आदळतात. खड्ड्यांसाठी वाहनाचा वेग कमी करताच मागील वाहन आदळते.

खड्ड्यांच्या प्रवासासाठी चांदवड, पिंपळगाव बसवंत, घोटी या तीन ठिकाणी तीनशे रुपयांच्या पथकराची कात्री खिशाला लागते. पिंपळगाव, चांदवड भागात पन्नास मिलिमीटर पावसाची नोंद झाली असताना, निकृष्ट दर्जाचे काम झाकले जाते. खड्डे बुजविण्यासाठी गेल्या वर्षी पाच लाखांचा खर्च झाला. हॉटेल जत्रा, ओझर येथील सायखेडा, गडाख कॉर्नर, पिंपळगाव बसवंतला चिंचखेड, वणी, चांदवडमधील सोग्रस फाटा चौफुली, राहुड घाट या भागात खड्ड्यांचे प्रमाण मोठे आहे. शहापूर ते विल्होळीदरम्यान महामार्गावरील खडी उखडल्याने वाहने घसरत आहेत. 
 
घोटी- सिन्नर मार्गावर साचलीत तळी 
घोटी- सिन्नर महामार्गावर तळी साचलीत. तीन वर्षांपासून महामार्गावर खड्डे निर्माण झाले असून, दुरुस्तीचा खर्च कररूपाने वाहनचालकांच्या माथी मारला जातो. सिन्नर- घोटी महामार्ग गेल्या वर्षी राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर झाला. मात्र तो हस्तांतरित झाला नाही. तसेच महामार्गाच्या डागडुजीच्या निकृष्ट दर्जाचे पितळ उघडे पडले. 


खोदकामामुळे चिखलाचे साम्राज्य 
नाशिक- पुणे महामार्गावरील सिन्नर फाटा, चेहेडी शिव, एकलहरे चौकात खड्डे पडलेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. दुतर्फा चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. रेल्वेस्थानकाकडे सिन्नर फाटा व विष्णुनगरकडे वळणावर वाहनधारकांना जीव मुठीत धरून जावे लागते. अनेकांना जीव गमवावा लागलाय. 

महामार्ग फाटलाय 
नाशिक- औरंगाबाद महामार्ग पिंपळस ते येवला या चाळीस किलोमीटरमध्ये फाटला आहे. अनेक ठिकाणी उखडला आहे. थोडा पाऊस झाला तरी महामार्गावर तळी साचतात. नैताळेत गांधीगिरी करत गेल्या वर्षी रस्त्यावर सत्यनारायणपूजा केली. माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी निवेदन दिले. त्यानंतर ठेकेदाराने माती टाकून खड्डे बुजविले. त्यातून ठिगळे दिल्यागत अवस्था झालेला मार्ग पुन्हा उखडला. 


वाहनांच्या दुरुस्तीचा भुर्दंड 
(आकडे रुपयांमध्ये) 

टायर-ट्यूब खराब होणे ः आठशे ते एक हजार 
सस्पेन्शन दुरुस्ती ः दुचाकी- तीनशे, चारचाकी- अडीच हजार 
चिमटा आउट ः दुचाकी- साडेतीनशे, चारचाकी- पाचशे ते सहाशे 
इंजिन गिअर बॉक्‍स ः दुचाकी- तीन ते साडेतीन हजार, चारचाकी- साडेसहा हजार ते आठ हजार 


खड्ड्यांमुळे बळावलेले आजार 
कंबरदुखी आणि मणक्‍यात गॅप, पाटदुखी 
वृद्धांचे हात-पाय दुखणे 
डोळ्यांची जळजळ 


डांबर मिळत नसल्याने खड्ड्यांची डागडुजी करता येत नाही. सिमेंटमिश्रित खडी टाकली जाते. पावसाची उघडीप आणि डांबर उपलब्धतेनंतर महामार्ग खड्डेमुक्त दिसेल. 
- प्रशांत खोडस्कर (व्यवस्थापक, महामार्ग प्राधिकरण) 

महामार्गावरील प्रवास सुरक्षित राहिला नाही. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले. त्याकडे दुर्लक्ष करत पथकर वसुलीचा धडाका लावला. त्याविरोधात शिवसेनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल. 
- दीपक शिरसाठ (सदस्य, जिल्हा परिषद) 

नाशिक- पुणे महामार्गावरील सिन्नर फाटा चौकात दरवर्षी खड्डे पडतात. खरे म्हणजे, आतापर्यंत महामार्गाचे काम होणे आवश्‍यक होते. 
- विशाल सांगळे (स्थानिक रहिवाशी) 

निफाड ते बोकडदरे या भागात महामार्गाची चाळण झाली. शेतमालाच्या गुणवत्तेचा प्रश्‍न तयार होतो. वाहनाच्या दुरुस्तीचा आणि शारीरिक समस्यांवरील इलाजाचा खर्च होतोय. 
- भावराव दराडे (शेतकरी बोकडदरे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com