Nandurbar: नर्मदा नदीकाठावरील दोन्ही तरंगते दवाखाने आजारी! वॉटर ॲम्ब्युलन्स 6 महिने बंद; अनेक गावे आरोग्य सुविधेपासून वंचित

Nandurbar News : आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे दोन्ही तरंगते दवाखाने नादुरुस्त होऊन किनाऱ्यावर अडगळीत पडले आहेत. त्यामुळे शासनाने स्पीड बोटद्वारे वॉटर ॲम्ब्युलन्सची निर्मिती केली.
Speed ​​Boat Water Ambulance lying closed on the remote Narmada river bank.
Speed ​​Boat Water Ambulance lying closed on the remote Narmada river bank.esakal
Updated on

वाण्याविहीर : सातपुड्याच्या पर्वतरांगेत दुर्गम भाग असलेल्या नर्मदा नदीकाठावरील गावांतील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून बार्जद्वारे तरंगता दवाखाना केला, मात्र आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे दोन्ही तरंगते दवाखाने नादुरुस्त होऊन किनाऱ्यावर अडगळीत पडले आहेत. त्यामुळे शासनाने स्पीड बोटद्वारे वॉटर ॲम्ब्युलन्सची निर्मिती केली.

डिसेंबरपासून मेपर्यंत तीही बंद होती. मेमध्ये स्पीड बोटची दुरुस्ती करण्यात आली. मात्र या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांअभावी नऊ गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या तरंगत्या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची जांगठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याची माहिती नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते नूरजी वसावे यांनी दिली. (Both floating hospitals on Narmada river sick Water ambulance closed)

सातपुड्यातील नर्मदा नदीकाठावर राहणाऱ्या चाळीस गावांतील नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने युरोपियन कमिशनच्या सहकार्याने अक्कलकुवा तालुक्यात एक, तर धडगाव तालुक्यात दोन अशा एकूण तीन तरंगत्या दवाखान्यांची निर्मिती केली. तरंगत्या दवाखान्यांपैकी २०२१ मध्ये एक तरंगता दवाखाना नादुरुस्त होऊन मणिबेली येथे पडून आहे.

२०२२ मध्ये आरोग्यसेवा पुरवत असताना बार्जला गळती लागून त्यात पाणी साचल्याने नर्मदा नदीकिनाऱ्यावर अडगळीत पडला आहे. अक्कलकुवा तालुक्यात येणाऱ्या मणिबेली, धनखेडी, चिमलखेडी, बामणी, गमन, डनेल, मुखडी या ठिकाणी आरोग्यसेवा पुरविणारा तरंगता दवाखाना सध्या बंद अवस्थेत पडून आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना आरोग्याच्या सोयी मिळणे जिकिरीचे झाले आहे. या भागात रस्ता नसल्याने अनेकांना आरोग्याच्या सुविधांअभावी जीव गमवावा लागत असल्याचे चित्र आहे.

वॉटर ॲम्ब्युलन्स सहा महिने नादुरुस्त

गेल्या १७ वर्षांत आरोग्य विभागाने तरंगत्या दवाखान्याची बार्ज पाण्याबाहेर काढून तिची तपासणी करण्याचीही तसदी घेतली नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेले दोन तरंगते दवाखाने किनाऱ्यावर पडून आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने स्पीड बोटद्वारे वॉटर ॲम्ब्युलन्स तयार करून नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्यास सुरवात केली.

डिसेंबर २०२३ मध्ये या वॉटर ॲम्ब्युलन्सचा पंखा तुटून नर्मदेच्या पाण्यात पडला. आरोग्य विभागाने ही बोट दुरुस्त करण्याचीही तसदी घेतली नाही. मे २०२४ मध्ये नर्मदेच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने मासेमारी करीत असताना तेथील नागरिकांनी टाकलेल्या जाळीत हा पंखा अडकला. (latest marathi news)

Speed ​​Boat Water Ambulance lying closed on the remote Narmada river bank.
'विशाळगडावर अतिक्रमण असेल तर प्रशासन योग्य कारवाई करेल, पण..'; खासदार शाहू महाराजांनी केलं महत्त्वाचं विधान

त्यानंतर ग्रामस्थांनी आरोग्य विभागाला कळवून पंखा सुपूर्द करून वॉटर ॲम्ब्युलन्स पुन्हा सुरू केली. मात्र त्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी नसल्याने आरोग्याच्या सुविधांपासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. शासनाने जांगठी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली. या केंद्रातील कर्मचाऱ्यांना वॉटर ॲम्ब्युलन्ससाठीही नेमणूक मिळाली आहे.

त्यामुळे ते कर्मचारी कुठे लक्ष देतील, असा सवाल करण्यात येत आहे. वॉटर ॲम्ब्युलन्सवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांना जांगठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती देण्यात आली. त्यामुळे ते दोन ठिकाणी नियमितपणे सेवा कशी पुरवतील, असा सवाल नूरजी वसावे यांनी केला आहे.

आरोग्य सुविधेअभावी गमवावा लागला जीव

नर्मदा नदीकिनाऱ्यावरील अनेक गावांमध्ये अद्यापही जाण्यासाठी रस्ते नाहीत. त्यातच अपुरा निधी, कर्मचाऱ्यांचा अभाव अशा अनेक कारणांमुळे या गावातील नागरिकांना आरोग्याबाबत मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. पावसाळ्याच्या दिवसांत सर्पदंशाच्या अनेक घटना घडतात.

त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या सुविधा न मिळाल्याने जीवही गमवावा लागतो. साधी एक गोळी घेण्यासाठीही रुग्ण व त्याच्या नातेवाइकांना पाच पाच किलोमीटर डोंगरदऱ्यांतून पायपीट करावी लागते. काही वेळा खासगी वाहन अथवा खासगी बोटीद्वारे केवडिया येथे सरदार सरोवर डॅमकडून घेऊन जावे लागते.

चिमलखेडी येथे आठ दिवसांपूर्वी एका रुग्णाची तब्येत खराब झाल्याने त्याला तीन दिवसांनंतर मोलगी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला बडोदा येथे खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या परिसरात २४ तास आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, अशी मागणी चिमलखेडी येथील नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते नूरजी वसावे यांनी केली आहे.

Speed ​​Boat Water Ambulance lying closed on the remote Narmada river bank.
Nashik Tree Plantation : पर्यावरण रक्षणार्थ सरसावले जलसंपदा सेवानिवृत्त अभियंता मित्रमंडळ!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.