तोरंगणमधील राघोबाबा सुरांचे बादशाह 

Live Photo
Live Photo

नाशिक ः हरसूलपासून दहा किलोमीटर अंतरावरील तोरंगण पाडा. राघो बोरसे हे साठी पार केलेले आदिवासी कलावंत इथले.

राघोबाबा नावाने पंचक्रोशीत ओळखले जातात. बाबा दिवसभर शेतात राबतात आणि सायंकाळी ते संगीताच्या दुनियेत हरवून जातात. बाबा सायंकाळी घरी घांगळ अहुजा (घांगळभक्ती) वाद्य वाजवतात. बाबांनी हे वाद्य घरीच बनवले. दोन भोपळे, बांबू, मेन, सागाचा करा, तार आणि मोरपिसे आदींचा वापर केला आहे. पेठ, हरसूलपासून जव्हार-ठाणेपर्यंत बाबा डोंगर देवता आणि ग्रामदेवतांचे गाणी गातात. शाळेची पायरी न चढले राघोबाबा सुरांचे बादशाह आहेत.

आदिवासी चिरा

दोन हजाराच्या आसपास लोकवस्तीच्या पाड्यावर हनुमानमंदिरासमोरील चौदाशे शतकानंतरच्या वीस आदिवासी चिरा लक्ष वेधून घेतात. हरसूलपासून ठाणापाडाशेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला खैराईगड. शिवकाळात हा गड मोघलांचा जहांगीरदार बनलेल्या कोळी राजाच्या ताब्यात होता. इ. स. 1676 मध्ये संपूर्ण रामनगरचा भूभाग जिंकताना शिवरायांनी खैराई किल्ला स्वराजात सामील करून घेतला. 
पेठचे संस्थानिक चिमणाजी दलपतराव यांनी इ.स. 1790 मध्ये कर्जापोटी हा गड नरहर गोपाळ पेशवे सरकार यांना दिला. छत्रपती शिवाजी महाराज सूरतेच्या मोहिमेवर जात असताना या किल्ल्यावर आले होते. या गडाचा आणखी इतिहास इथून जवळ असलेल्या तोरंगण पाड्यावरील आदिवासी चिरा अभ्यासल्यानंतर पुढे येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे खैराई गडावर जाताना इथे विजयाचे तोरण बांधले होते म्हणून पाड्याला तोरंगण असे नाव मिळाल्याची माहिती मौखिक परंपरेने आताच्या ज्येष्ठांपर्यंत पोचली. शेजारील दलपतपूर गावामुळे त्याला पुष्टी मिळते. विरगळ अभ्यासक अनिल दुधाने यांनी चिरा आणि विरगळमध्ये फरक असल्याचे सांगून विरगळ नाशिकमध्ये कमी असल्याचे स्पष्ट केले. नाशिकच्या आदिवासी भागात चिरा आढळतात, त्यांना आदिवासी चिरा म्हणून संबोधले जाते. पूर्वजांची आठवण म्हणून त्याकडे पाहिले जाते. महादेव कोळी समाजातील शूरवीरांच्या चिरा असण्याची शक्‍यता वर्तवण्यात येते. 
 
खासगी बोअरमधून पाणी 
तोरंगणमध्ये दोन हातपंप आणि तीन बोअर आहेत. पण त्याला पाणी नाही. पाड्याच्या बाजूच्या नदीजवळ विहीर खोदून पाड्यापर्यंत पाईपलाईन आली. पण उन्हाळ्यात विहिरीतील पाणी आटल्याने गावात पाणी येत नाही. पाण्यासाठी तीन किलोमीटरपर्यंत महिलांना पायपीट करावी लागते. गावातील शेतकरी काशिनाथ बोरसे याने सात वर्षापूर्वी बोअरवेल खोदली असून त्यातून मोफत पाणी उपलब्ध करुन देण्यात येते. गावासाठी दोन योजनांचे पन्नास लाख पाण्यात गेलेत. उलटपक्षी टॅंकर बंद करण्यात आला. 

राज्यस्तरीय खो-खोपटू
वारली कलेचा उगम आदिवासी भागातून झालेला असून नैसर्गिक वाड्याची निर्मिती माहेरघर म्हणून आदिवासी पाड्यांकडे पाहिले जाते. शेती आणि मजुरी करणाऱ्या आदिवासींनी आपली परंपरा जोपासली आहे. गावाजवळून कास आणि रास या दोन नद्या वाहतात. गावात पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहे. इथले खो-खोपटू राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत पोचलेत. गावात अनेक वर्षांपासून भजनी मंडळ असून गंगाराम बोरसे, अमृत पेंढार, काशीबाई बोरसे, दत्तू भवर, यशवंत बोरसे आदी त्यात सहभागी होतात. गावात आदिवासीदिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. इथली होळी पंचक्रोशीतील मोठा उत्सव असतो. पाडव्याला देवतेजवळ जागरणाचा कार्यक्रम होतो. 

गावातील वीस चिरा दुर्लक्षित आहेत. त्याविषयी अभ्यास झालेला नसल्याने त्यांची दुरावस्था झाली आहे. काही चिरा मातीच्या ढिगाऱ्यात बुजून गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या गावात आले असल्याचे आमचे पूर्वज सांगत आलेत. दसरा आणि होळी सणाला चिरांची पूजा होते. 
- मुरली बोरसे (ग्रामस्थ) 

गेल्या सात वर्षांपासून आम्ही आमच्या बोअरमधून गावाला मोफत पिण्याचे पाणी देत आहोत. मात्र गावासाठी कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना व्हायला हवा. तोपर्यंत उन्हाळ्यात पाड्यावर पिण्याच्या पाण्याचा टॅंकर सुरु व्हायला हवा. 
- काशिनाथ बोरसे (शेतकरी) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com