नाशिक : भरधाव वेगात विनाहेल्मेट दुचाकी चालविताना नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. या भीषण अपघातामध्ये गंभीर जखमी दुचाकीस्वार युवकाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली. दुचाकीस्वार युवकाने हेल्मेट परिधान केले असते तर त्याचा जीव वाचला असता.
रोहित चंद्रकांत पाटील ( २५, रा. सदिच्छा नगर, इंदिरानगर, नाशिक) असे अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. अक्षय भीमराव मनेरे (२१, रा. गार्डन अव्हेन्यु सोसायटी, डे केअर शाळेजवळ, इंदिरानगर) या युवकाच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता. २) रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास मयत रोहित पाटील व अक्षय हे दोघे शाईन दुचाकीवरून (एमएच १५ जीके १७७२) वडनेर गेटकडून पाथर्डी सर्कल मार्गे घराकडे जात होते.
भरधाव वेगात दुचाकी चालवत असताना रोहितचे निर्मल बाबा दरबारच्या कॉर्नरवर नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातामध्ये रोहितला गंभीर दुखापत झाल्याने त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, यादरम्यान त्याचा मृत्यु झाला. तर, अक्षय यासही दुखापत झाली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेल्मेट असते तर...
या अपघातात मयत झालेल्या रोहित पाटील याने हेल्मेट घातलेले नव्हते. त्याने हेल्मेट घातलेले असते तर त्याचा किमान जीव तरी वाचला असता. अशा घटनांमुळेच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी गेल्या १ तारखेपासून हेल्मेट सक्तीची तीव्र मोहीम पुन्हा सुरू केली आहे. दुचाकीचालकांनी हेल्मेट परिधान केले तर अपघातात किमान जीव वाचण्याची शक्यता अधिक असते. तरी दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन शहर पोलीस आयुक्तालय व ‘सकाळ’ माध्यम समुहातर्फे करण्यात येत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.