
गोदाप्रदूषण मुक्तीसाठी आयुक्तांचा ॲक्शन मोड
नाशिक : गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न तर होतीलच, परंतु प्रदूषण मुक्तीच्या लढ्यात नाशिककरांनीदेखील सहभागी होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच गोदावरी नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याच्या नाल्यानांच अटकाव करताना दुसरीकडे सांडपाण्याच्या जोडण्या थेट नदी, नाल्यांमध्ये सोडले आहे. त्याचे सर्वेक्षण करून जोडणीधारकांना प्रदूषणाबाबत सजग केले जाणार आहे. त्यानंतरही जोडण्या मलजल नाल्यांना न जोडल्यास दंडात्मक कारवाई व जोडणी खंडित करण्याची कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी घेतला आहे.
नाशिक शहरातून १९ किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या गोदावरी नदी दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. सिंहस्थ कुंभमेळ्याबरोबरच दररोज हजारो भाविक गोदावरीत स्नानासाठी देशभरातून येतात. गोदावरीचे धार्मिक महत्त्व देशभर असले तरी नाशिककरांच्या दृष्टीने दुर्लक्षित झालेली गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. गोदावरी स्वच्छतेसाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या, आता तर केंद्र सरकारकडून ‘नमामि गोदा’ प्रकल्पासाठी जवळपास १८०० कोटींचा निधी दिला जाणार आहे. गोदावरी नदीची मुळ समस्या सांडपाण्याचे नाले आहेत.
गोदावरी नदीत एकूण ६७ नाले मिसळतात, त्यातील तेरा नाले मोठे आहेत. त्या नाल्यांमधून गोदावरीत मिसळणारे सांडपाणी रोखणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन आयुक्त रमेश पवार यांनी गुरुवारी (ता. ३१) सकाळी लेंडी व वाघाडी नाल्याची पाहणी केली. या पाहणीत आयुक्त पवार यांना भीषण वास्तव लक्षात आले. त्यात मुळ नाल्यातही छोटे नाले मिसळले असून, या छोट्या नाल्यांना घराघरांच्या सांडपाण्याच्या वाहिन्या जोडण्यात आल्या आहेत. तर, पावसाळी गटारींमध्ये सांडपाणी सोडल्याची बाब लक्षात आली. त्यामुळे थेट कारवाईचे हत्यार न उपसता प्रथम नागरिकांना प्रबोधनाच्या माध्यमातून सांडपाण्याच्या जोडण्या नाले, नदीमध्ये सोडू नये. त्यातून होणाऱ्या प्रदूषणाची बाब समजावून सांगितले जाणार आहे. सांडपाण्याच्या जोडण्या नागरिकांनी स्वतः बंद करावे. आवाहनाला प्रतिसाद न मिळाल्यास दंडात्मक कारवाईचे हत्यार उपसले जाणार आहे.
भुयारी गटारींमध्ये प्रवाह वळविणार
मोठे १३ नाल्यांचे सांडपाण्याचे प्रवाह भुयारी गटारींमध्ये वळविले जाणार आहे. भुयारी गटारीतून मलनिस्सारण केंद्रात पाठविले जाईल. तेथील पाण्यावर प्रक्रिया करून गोदावरी नदीत सोडले जाणार आहे. मलनिस्सारण केंद्रांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाणार असून त्यासाठी शासनाकडून निधी मागविला जाणार आहे.
गोदावरीमध्ये मिसळणाऱ्या नाल्यांमध्ये घरगुती नाल्यांचे सांडपाण्याच्या जोडण्या आहेत. त्या जोडण्या बंद करण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जाणार आहे. पंधरा दिवसांत सर्वेक्षण होईल. गोदावरी मुक्तीसाठी नाशिककरांचे सहकार्य हवे आहे.
- रमेश पवार, प्रशासक, महापालिका
Web Title: Action Of Commissioner For Godavari River Pollution Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..