Nashik News: लिलावानंतर शेतकऱ्यावर अतिरिक्त आर्थिक ताण! सौदा झाल्यानंतर खळ्यावर माल पोहचविण्याची अट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A stone dirt road leading to an onion merchant's barn.

Nashik News: लिलावानंतर शेतकऱ्यावर अतिरिक्त आर्थिक ताण! सौदा झाल्यानंतर खळ्यावर माल पोहचविण्याची अट

रेडगाव खुर्द (जि. नाशिक) : बाजार समितीत पिकांचा लिलाव पूर्ण झाल्यावर व्यापाऱ्यांकडून संबंधित शेतमाल हा थेट त्याच्या खळ्यावर देण्याची अट शेतकऱ्यांना घातली जात आहे. यामुळे सदरचा माल खळ्यावर पोचविताना उत्पादक शेतकरी यांना अतिरिक्त आर्थिक भार सोसण्याची वेळ आली आहे.

यातच खळ्यावर जाण्यासाठी रस्ते नसल्याने वाहन दुरुस्तीचा भारही उचलावा लागत आहे. (Additional financial stress on farmer after crop auction Condition of delivery of goods to barn after deal at market committee Nashik News)

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर विशेषतः कांदा खरेदीदार व्यापाऱ्याच्या खळ्यावर खाली करण्यासाठी शेतकऱ्यांना वाहन घेऊन जावे लागते. मात्र व्यापाऱ्यांना बाजार आवार परिसरात आवश्यक पुरेशी जागा उपलब्ध नाही.

बाजार आवार आणि व्यापाऱ्याचे खळे यामध्ये तीन किलोमीटरचे अंतर शासनाने घालून दिले आहे. मात्र जागाच नसल्याने व्यापारी बाहेर जागा शोधतात. शहरा नजीकच्या जागेचे भाव गगनाला भिडले असल्याने, शहराबाहेरील जागेला महत्त्व देत आहे.

लांब जागा असल्याने व्यापाऱ्यांची सोय होत असली, तरी शेतकऱ्यांना मात्र याचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसतो. बहुतेक व्यापाऱ्यांच्या खळ्यात जाण्यासाठी कच्चे मुरूम मातीचे उघड्या दगडांचे रस्ते असल्याने वाहने नादुरुस्त होत आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

त्यामुळे मोठा मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंड सहन केल्याशिवाय पर्याय उरत नसल्याने त्याला नाइलाजास्तव हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मात्र याकडे सर्व घटक सोईस्कर दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी वर्गात याबाबत नाराजीचा सूर आहे.

"व्यापाऱ्याचे खळे आडमध्ये असेल तर त्याठिकाणी बाजार समितीस खर्च केल्यास पणन मंडळ विचारणा करते. छोट्या रकमेचे काम असेल तर आम्ही मुरूम वगैरे टाकतो. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये. हीच आमची भूमिका असते. नाशिक जिल्ह्यात बाजार समितीत खुला माल मोठ्या प्रमाणात विक्रीस येतो. त्यामुळे व्यापाऱ्यांनी रस्त्यासाठी स्वतः खर्च करणे आवश्यक आहे. जागेअभावी या समस्या कमी अधिक प्रमाणात सर्वत्र आहे."

- नरेंद्र वाढवणे, सचिव लासलगाव कृउबा