Nashik : महाराष्ट्राच्या टरबूजाची लाली फिकी | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Watermelon news

Nashik : महाराष्ट्राच्या टरबूजाची लाली फिकी

मालेगाव : कसमादेसह नाशिक जिल्ह्यातील आंबे बहरातील डाळिंब देशात तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारात भाव खात आहे. मात्र, नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पावसाळी टरबुजाची लाली यावर्षी काहीशी फिकी पडली आहे. गुजरात, राजस्थान व कर्नाटकमधील टरबूजांची आवक वाढल्याने दिल्ली बाजारात महाराष्ट्राचा विशेषतः नाशिक जिल्ह्यातील टरबुजांची मागणी कमी झाली आहे.

टरबूजाचे घाऊक भाव ६ ते ८ रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. दिल्ली बाजारात रोज सरासरी ४० ट्रक टरबूजांची आवक आहे. अति पावसामुळे आधीच फवारणीचा खर्च वाढल्याने व पिकाला गेल्या वर्षाच्या तुलनेत भाव नसल्याने बळीराजा विवंचनेत आहे. (arrivals from Gujarat Rajasthan Karnataka increased Maharashtra watermelon demand decreased nashik news)

अलिकडच्या काळात पिक पद्धतीत बदल झाले आहेत. पूर्वी टरबूज हे हंगामी व उन्हाळी पीक म्हणून ओळखले जात होते. काही वर्षापासून हे पिक बारमाही झाले आहे. त्यातच देशातील विविध भागात त्याचे वर्षभर उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्ह्यासह खान्देशमध्ये उन्हाळी टरबूजाला मोठी मागणी असते.

त्यामुळे लागवडही वाढत आहे. पावसाळी टरबूज काहीसे जोखमीचे पिक आहे. नासिक जिल्ह्यात जवळपास पाच हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. अति पावसामुळे फवारणीचा खर्च वाढला आहे. त्यातच वेल व फळाची पुरेशी वाढ होत नाही. दोन किलोच्या आतील लहान फळे व्यापारी घेत नाही.

पावसाळी टरबूजाचा ग्राहक दिल्ली व उत्तर भारतात अधिक आहे. गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील पावसाळी टरबूज ऑगस्टमध्ये १२ ते १५ रुपये किलोने विकला गेला. काही शेतकऱ्यांना २० ते २२ रुपयांपर्यंत भाव मिळाला होता.

यावर्षी ऑग्रस्टच्या सुरवातीला ९ ते १० रुपयांपर्यंत भाव होता. जून व जुलै या काळात उत्तरप्रदेश मधून मालाची सर्वाधिक आवक होती. सध्या गुजरात, राजस्थान व कर्नाटातील टरबूज बाजारात येत आहे. आवक वाढल्यामुळे घाऊक भाव सहा रुपयांपर्यंत खाली आले आहेत. त्यातही व्यापारी दोन किलोपेक्षा मोठे फळ घेत आहेत.

हिवाळी हंगामाबाबत शेतकरी बॅकफूटवर

रमजान पर्वाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी नाशिक जिल्ह्यासह खान्देशात विक्रमी टरबूज लागवड करण्यात आली होती. मार्च व एप्रिलमध्ये भाव दहा रुपयांपेक्षा अधिक होते. १५ एप्रिलनंतर भाव कोसळले. शेतकऱ्यांना २ ते ३ रुपये किलोने टरबूज विकावा लागला. बहुतांशी शेतकऱ्यांना पावसाळी टरबूजही परवडला नाही. त्यामुळे टरबूज लागवड करायची की नाही, या विवंचनेत शेतकरी आहेत.

"गेल्या वर्षी मिळालेला भाव पाहून सर्वच भागातील शेतकऱ्यांनी पावसाळी टरबूज लागवड केली. दिल्ली बाजारात आवक वाढल्याने पुरेसा भाव मिळाला नाही. यावर्षी अती पावसामुळे फवारणी व इतर खर्च वाढला. एकरी ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत खर्च आला. प्रतिकूल परिस्थितीत पिक घेऊनही खर्च निघणे अवघड आहे. उन्हाळी पाठोपाठ पावसाळी टरबूज उत्पादन बहुतांशी शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरले." - दिलीप जाधव, टरबूज उत्पादक, रावळगाव

टॅग्स :NashikWatermelon