Nashik News : शिर्डी महामार्गावर साईभक्तांचा प्रवास ‘राम भरोसे’; उपायोजनांकडे ‘न्हाई’चे दुर्लक्ष
Nashik News : सिन्नर-शिर्डी महामार्गावरून प्रवास करताना साई भक्तांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. न्हाई प्रशासनाकडून रात्री नियमित गस्त नसणे, अपघातांना निमंत्रण देणाऱ्या ब्लॅक स्पॉट्सकडे झालेले दुर्लक्ष प्रवाशांच्या जीवास धोका देणारे ठरले आहे.
अर्धवट बांधकाम असताना, रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आणि टोलवसुली दणक्यात सुरू झाली. (Bad road condition on Shirdi Highway Due to negligence of administration nashik news)
रस्त्याच्या नियमित देखभालीचे काम परप्रांतीय ठेकेदाराने करायचे, की स्थानिक पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी. यात मतभेद असल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सावळी विहीर फाट्यादरम्यान शिर्डी महामार्गाचे चौपदरीकरण जवळपास ८० टक्के झाले आहे. रुंदीकरण झाल्यामुळे महामार्गवरील अपघात कमी होतील, ही अपेक्षा न्हाई प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे फोल ठरली आहे.
एक महिन्यापासून रात्री महामार्गावर गस्त घालणारे टोल प्रशासनाचे वाहन जागेवर उभे आहे. रुग्णवाहिकेचे भाडे कोणी द्यायचे, असा प्रश्न आहे. रस्त्याची नियमित देखभालीसाठी माणसे येत नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. वावी टोल नाक्यावरून महामार्गाच्या देखभालीचे नियंत्रण होते.
याच ठिकाणी रुग्णवाहिका व आपत्कालीन मदत वाहनही असते. मात्र, कंत्राटावरून जुपलेल्या भांडणात ना रुग्णवाहिका, ना आपत्कालीन वाहन. त्यामुळे अपघात झाल्यावर वेळेत मदत पोचत नाही. संभाव्य अपघात ठिकाणी रिफ्लेक्टर्स नाहीत. त्यामुळे रात्री महामार्गावर प्रवाशांना जीव मुठीत धरावा लागतो.
पांगरीत सर्वाधिक अपघात क्षेत्र
पांगरी गावात उड्डाणपूल व महामार्गाचे काम अर्धवट आहे. सर्व्हिस रोडवरच अतिक्रमणे असल्यामुळे ही सर्व ठिकाणी ब्लॅक स्पॉट बनली आहेत. मात्र, न्हाई प्रशासनाने संबंधितांना अभय दिल्याची चर्चा आहे. महामार्गावरील नव्या व जुन्या अतिक्रमणांकडे न्हाई प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. वावी बसस्थानकात शिवशाही बस येत नसल्याने प्रवाशांना रस्त्यावरच उतरावे लागते.
झाडांनी सोडला जीव
महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या मोंटे कार्लो कंपनीकडे पुढील सात वर्षांसाठी महामार्गाच्या दुतर्फा, दुभाजकांमध्ये लावलेल्या झाडांची निगा राखण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी कंत्राटदार नेमला आहे. तीन महिन्यांपासून झाडांची निगा राखलेली नाही. त्यामुळे झाडांनी जीव सोडायला सुरवात केली आहे. तीन महिन्यांपासून संबंधितांना पाणी टँकर आणि झाडांच्या देखभालीचे पैसे अदा केल्याचे समजते. ही रक्कम काही लाखांच्या घरात आहे.
''वर्षभरापूर्वी पाथरेजवळ झालेल्या बस अपघातास कारणीभूत ठरवत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी मोंटे कार्लो कंपनी व्यवस्थापनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. दोन दिवसांपूर्वी वल्लेवाडी येथील तरुणाचा अपघातात बळी गेला. पांगरीत झालेला अपघात न्हाई प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला होता.
त्यामुळे तरुणाच्या मृत्यूप्रकरणी न्हाईचे प्रकल्प व्यवस्थापक व मोंटे कार्लो कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी वावी पोलिसांत मृताचे नातेवाईक व मित्रपरिवार तक्रार देणार आहेत. गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन करण्यात येईल.''-गणेश वेलजाळी, वावी
''शिर्डी महामार्गावरील संभाव्य ब्लॅक स्पॉट्स व इतर बाबींची खबरदारी घेतली जात आहे. बंद असलेले आपत्कालीन मदत वाहन पुन्हा कार्यरत केले आहे. स्थानिक नागरिक आणि ठेकेदार यांच्यात मतभेद असल्यामुळे काही प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो. अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.''-भाऊसाहेब साळुंके, प्रकल्प संचालक, न्हाई
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.