
नाशिक : ओबीसी आरक्षणावर (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीचा (NMC election) बिगूल वाजला असला, तरी प्रमुख पक्ष या नात्याने भाजप पक्षात अजून कुठल्याही हालचाली नाही.
प्रमुख विरोधक शिवसेनेच्या ढासळणाऱ्या गढीकडेच पक्षाच्या नेत्यांचे लक्ष आहे. स्वकर्तृत्वापेक्षा इतरांच्या बुडत्या जहाजाकडेच पाहणाऱ्या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये जान आणण्यासाठी बूस्टर डोसची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. (BJP hopes on Shiv Sena nashik political Latest Marathi News)
२०१७ मध्ये महापालिकेच्या इतिहासात प्रथमच बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपमध्ये सुरवातीचे काही दिवस बरे गेले. परंतु त्यानंतर मात्र बेबनाव दिसला. महापालिकेच्या सत्तेवर वर्चस्व मिळविण्यासाठी आमदारांमध्ये स्पर्धा झाली.
गिरीश महाजन पालकमंत्री असल्याने त्यांनी सर्व सूत्रे त्या वेळी आमदार असलेल्या बाळासाहेब सानप यांच्याकडे सोपविले. नंतर गटबाजी वाढत गेली. सत्तेच्या सेकंड टर्ममध्ये आमदारांच्या गटबाजीचा प्रभाव दिसला नाही. नव्याने निवडून आलेल्या आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले नाही.
आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी मतदारसंघापुरते महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले. आमदार सीमा हिरे यांचा सिडको संदर्भातील प्रश्नांना हात लावण्यापुरता संबंध राहिला. त्यानंतर पक्षांतर्गत कुरघोडी सत्तेतील पदावरून झाली.
नेत्यांच्या दौऱ्याचा खर्च करण्यापासून ते सत्तेतील वाट्यापर्यंत वाद विकोपाला गेले. शेवटच्या अडीच वर्षांत विरोधी पक्ष अधिक बळकट वाटला. भाजप सत्ताकाळात कामे झाले नाहीत असे नाहीत, परंतु देशपातळीवर ज्याप्रमाणे मार्केटिंगचे तत्त्व अंगीकारले जाते, तो अर्क खालच्या पातळीपर्यंत उतरला नाही. भाजपमधील कच्च्या दुव्यांचा फायदा घेत शिवसेना कायम झळकत राहिली. त्यामुळे आत्मविश्वास इतका दुरावला, की शिवसेनेने १०० प्लसचा नारा दिला.
संघटना खिळखिळी
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, तसेच राज्यात सत्ता असल्याने शिवसेनेची ताकद मध्यंतरी वाढली होती. शहरात संघटना बळकट करण्यासाठी माजी आमदार वसंत गिते यांच्यासह सुनील बागूल यांना पुन्हा पक्षात स्थान देऊन संघटना बळकट करण्यात आली.
त्याचबरोबर भाजपमधील काही नगरसेवकांना खेचण्यात शिवसेनेला यश आले. शिवसेनेला अच्छे दिन येत असल्याने भाजपमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता पसरली. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात गिरीश महाजन यांनी नाशिक दौरा करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतरही मात्र भाजपची पीछेहाट होत राहिली. पुढील निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या वाढूनदेखील भाजप ५० च्या पुढे जाणार नाही, असा दावा केला गेला. मात्र एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसह फुटल्याने संघटना खिळखिळी झाली. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराला तोंड द्यावे लागणार नाही.
सुंठी वाचून खोकला गेला
सुंठी वाचून खोकला गेल्याने भाजपच्या गोटात काही प्रमाणात समाधानाचे वातावरण आहे. महापालिका निवडणुकीमध्ये काही करावे लागणार नाही, अशी भावना निर्माण झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापूर्वीच अधिक खचला आहे.
उरलेसुरले शिवसेनेची गढी ढासळत असल्याने भाजपमध्ये सध्या निवांत आहे. विरोधी पक्षच दुबळा होत असताना, फारसे काही करावे लागणार नाही, अशी मानसिकता सध्या भाजपमध्ये आहे.
"आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा विकासाच्या मुद्द्यावर बहुमताने निवडून येईल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच नाशिकमध्ये येऊ."
-गिरीश महाजन, भाजप नेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.