
Nashik News : 3 उमद्या तरूणांच्या जाण्याने हळहळली चास पंचक्रोशी; रात्री उशिरा अंत्यसंस्कार
नांदुर शिंगोटे (जि. नाशिक) : तुळजापूर- सोलापूर रस्त्यावर मंगळवारी (ता. २१) पहाटे सहाच्या सुमारास झालेल्या अपघाताची माहिती कळताच चास (ता. सिन्नर) गावासह पंचक्रोशीच्या काळजाचा ठोकाच चुकला.
या अपघातात चास गावातील तीन उमदे तरूण ठार झाले असून, सहाजण जखमी झाले आहेत. त्यामुळे गावात दिवसभर एकाही घरात चुल पेटली नाही किंवा अन्य कोणताही व्यवहार झाला नाही. (Chas villagers in sad at departure of 3 youths accident death at near tuljapur Late night funeral Nashik News)
संपूर्ण चास गावाने मंगळवारी दिवसभर दुखवटा पाळला. दरम्यान, रात्री उशिरा तिघांवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील तिन उमद्या तरूणांच्या एकाचवेळी अपघाती मृत्यूमुळे नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा हृदयद्रावक होता. एरवी मोठ्या प्रमाणावर गजबज असलेल्या या गावात मंगळवारी सकाळपासूनच स्मशान शांतता दिसून आली.
सर्वच ग्रामस्थ एका ठिकाणी बसून शोक सागरात बुडाले होते. रात्र झाली तरीही सारे एकाच ठिकाणी थांबून होते. चास पंचक्रोशीत ही सर्वात मोठी दुर्घटना मानली जात आहे. विशेष म्हणजे हे तिनही तरूण सर्वसामान्य कुटुंबातील उमदे तरूण असून, तिघेही अविवाहित होते. त्यामुळे सर्व मित्र परिवारातही तिघांच्या अपघाती मृत्यूमुळे मोठी पोकळी निर्माण झालेली आहे.
सानप कुटुंबाचा आधार हरपला
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या निखिलचे वडील रामदास सानप हे गेल्या ३० वर्षांपासून चास (ता. सिन्नर) येथे फोटोग्राफी व्यवसाय करत आहेत. काही दिवसांपूर्वी डेव्हलपिंगच्या क्षेत्रात पदार्पण करून त्यांनी आपल्या कुटुंबाची घडी चांगल्या प्रकारे बसवली होती.
निखिल हा त्यांचा एकुलता एक मुलगा. उच्चशिक्षित असूनही वडिलांना व्यवसायात मदत करत असल्याने सानप कुटुंबियांना त्याचा मोठा आधार होता. त्यामुळे निखिलच्या जाण्याने सानप कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.
हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....
खैरनार कुटुंब ओशाळले
अथर्व शशिकांत खैरनार बी. कॉम.चे शिक्षण घेत होता. त्याचे वडील शशिकांत खैरनार हे शेती व्यवसाय सांभाळून मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष पुरवित होते. त्यांना दोन मुले असून, एक मुलगा शिक्षणासाठी पुणे येथे राहतो.
सर्वसामान्य कुटुंब असल्याने त्यांची संपूर्ण भिस्त शेतीवरच आहे. पदवीपर्यंत शिक्षणानंतर अथर्वही कुटुंबाला हातभार लावेल, या अपेक्षेने कष्ट उपसत असलेल्या खैरनार कुटुंबावर अथर्वच्या अशा अकाली निधनामुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
भाबड परिवार हतबल
अनिकेतचे वडील बाळासाहेब भाबड यांना अनिकेत व संकेत अशी दोन मुले. ते भाजीपाला व्यापारी असून, याच व्यवसायातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनिकेतही या कामात लक्ष देत कुटुंबाला हातभार लावत होता.
तर त्याचा भाऊ संकेत हा फोटोग्राफी व्यवसाय करून कुटुंबाला मदत करत होता. भाजीपाला व्यवसायाबरोबरच शेतीच्या माध्यमातून गुजराण करत असलेल्या भाबड कुटुंबातही अनिकेतच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.