Nashik News : अजंग-रावळगाव शिवारातील शेती महामंडळाच्या माळरानावर नंदनवन फुलविणाऱ्या माजी सैनिक शिवाजी डोळे यांचे पंतप्रधानांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये कौतुक केले अन् मालेगावचे नाव पुन्हा एकदा देशपातळीवर चमकले.
या उपक्रमातून वेंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पॉवर अॅन्ड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेडच्या माध्यमातून डोळे यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान’ या घोषणेची खऱ्या अर्थाने प्रचिती दिल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
त्यांच्या शेतीतील नवनवीन प्रयोगांचे सर्वत्र कौतुक होत आहे. (greenary on Malrana of Ajang Rawalgaon Prime Minister praises ex armyman shivaji dole in Mann Ki Baat Nashik News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. २८) ‘मन की बात’ या कार्यक्रमात श्री. डोळे व त्यांच्या संस्थेचे आणि त्यांच्या एकूणच टीमचे भरभरून कौतुक केले. त्यांच्या प्रयोगाची महती आता देशभरात गेली आहे.
श्री. मोदी म्हणाले, १९६५ च्या युद्धाच्या वेळेस, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान-जय किसान’ हा नारा दिला होता. त्यानंतर अटलजींनी त्याला जय विज्ञानही जोडले. काही वर्षांपूर्वी देशाच्या वैज्ञानिकांशी चर्चा करताना मी जन संशोधनचा उल्लेख केला होता.
‘मन की बात’मध्ये आज अशाच एका व्यक्तीबद्दल बोलतो. श्री. डोळे साकूर (ता. नांदगाव) येथील रहिवासी आहेत. गरीब आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. माजी सैनिक या नात्याने त्यांनी देशसेवा केली.
सेवा समाप्तीनंतर काही तरी नवीन करावयाचे, या हेतूने त्यांनी कृषी पदविका घेतली. ‘जय जवान-जय किसान’ हे वलय पूर्ण झाले. यानंतर त्यांनी वीस सहकाऱ्यांचे संघटन साकारले. माजी सैनिकांनाही त्यांनी त्यात सामील करून घेतले.
या समूहाने वेंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पॉवर अॅन्ड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेड ही सहकारी संस्था कार्यान्वित केली. निष्क्रिय संस्थेचे पुनरुज्जीवन केले. व्यंकटेश्वरा ॲग्रोचा शेती मॉल व किराणा मॉलही सुरू झाला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पाचशे एकर शेती कराराने
संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कर्नाटकात शेती घेतली. पाठोपाठ अजंग- रावळगाव शिवारातील शेती महामंडळाची पाचशे एकर जमीन कराराने घेतली. या जमिनीत एक कोटी लिटर पाणीसाठा होईल, असे शेततळे साकारले.
हा समूह महाराष्ट्र आणि कर्नाटकात कार्यरत असून, माजी सैनिकांसह १८ हजार नागरिक या संस्थेशी जोडले गेले. सामूहिक पद्धतीने ५०० एकर जमिनीत ते शेती करत आहेत. सेंद्रिय शेती आणि डेअरीही सुरू केली आहे.
द्राक्ष, केळी, डाळिंब आदी फळ पिकांसह हळद, विविध भाजीपाला लागवड केली. द्राक्षांची युरोपातही निर्यात केली. कर्नाटकात काजू व अन्य पिके घेतली. यातून ‘जय विज्ञान आणि जय अनुसंधान’ हे वर्तुळ पूर्ण झाले.
शिवाजी डोळे हे शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. या शेतीमुळे परिसरातील अनेकांना रोजगार उपलब्ध झाला. उपजीविकेची साधनेही निर्माण झाली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.