कसमादेचे डाळींब राजस्थानपेक्षा भारी!; हस्त बहारात ओलांडला दीडशेचा भाव

भाव टिकून राहिले व निसर्गाची साथ मिळाली तर डाळिंबाचा गोडवा आणखी वाढेल.
dalimba
dalimbasakal

मालेगाव : कसमादेसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोरोनाकाळातही डाळींबाने चांगली साथ दिली. सध्या मर व तेल्या रोगाचे पिकावर सावट आहे. असे असतानाही सध्या डाळींब भाव खाऊन जात आहे. कसमादेतील डाळिंबाने दीडशेचा भाव ओलांडला आहे. १७० रुपयांपर्यंत भाव पोहोचला होता. पंधरा दिवसापासून राजस्थानचा डाळींब बाजारात आला असला तरी कसमादेचा निर्यातक्षम डाळींब उजवा ठरत आहे. बाजारात आवक वाढल्याने भाव २० ते २५ रुपये किलोने घसरले आहेत. डाळींबाला मिळत असलेल्या भावामुळे उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, आंबे बहारात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याचे नियोजन शेतकऱ्यांकडून केले जात आहे. भाव टिकून राहिले व निसर्गाची साथ मिळाली तर डाळिंबाचा गोडवा आणखी वाढेल.

कसमादेत मृग, हस्त व आंबे असे तीनही बहार घेतले जातात. मर व तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर डाळिंबाचे उत्पादन घटले होते. गेल्या पाच वर्षात रोग नियंत्रणात आल्याने डाळिंबाचे क्षेत्र झपाट्याने वाढले. नाशिक जिल्ह्यात ३० ते ३५ हजार हेक्टरवर डाळींबाचे क्षेत्र पोहोचले आहे. दोन वर्षापासून काही ठिकाणी मर व तेल्या रोगाचा पुन्हा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्यातच अलिकडे त्यात वाढ झाली. कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात आली आहे. शेतकरीही सावध झाल्याने रोगाचा फैलाव आटोक्यात आहे. पूर्वी शेतकऱ्यांचा कल मृग बहारात उत्पन्न घेण्याकडे होता. अति पावसामुळे नुकसान व फवारणीचा खर्च वाढत असल्यामुळे हस्त व आंबे बहाराकडे शेतकरी वळले आहेत.

दोन महिन्यापासून डाळिंबाचे भाव शंभरापेक्षा अधिक राहिले आहेत. कसमादेत निर्यातक्षम डाळींब उत्पादीत होते. नियार्तक्षम डाळींब १५० ते १७० रुपये किलोने विकला गेला. मध्यम प्रतीचा डाळींब ११० ते १४० रुपये किलोने विकला जात आहे. कोरोना नियंत्रणात आल्याने देशभरात लग्नसोहळ्यांची धूम आहे. दिल्लीसह उत्तर भारतात कसमादेतील डाळींबाला मागणी आहे. देशातील मोठ्या बाजारपेठांमधील घाऊक विक्रेते बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत आहेत.

राजस्थानचे डाळींब बाजारात

देशात डाळिंबाचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते. सोलापूरनंतर डाळींब उत्पादनात नाशिक जिल्ह्याचा क्रमांक आहे. अलीकडच्या काळात राजस्थानमध्येही डाळिंबाचे क्षेत्र वाढले आहे. कसमादेतील डाळींबावरील हजारो कुशल कामगार सातत्याने राजस्थानमध्ये कामासाठी जातात. १५ दिवसापासून राजस्थानचा डाळींब बाजारात येऊ लागला आहे. त्यामुळे भावात वीस ते पंचवीस रुपयाने घट झाली असली तरी कसमादेतील निर्यातक्षम डाळींबाचे भाव मात्र टिकून आहेत. इतर राज्यातील डाळींब बाजारात आला असला तरी कसमादेतील डाळींबाचा गोडवा देशभरात परिचीत आहे. आवक कितीही वाढली तरीदेखील भाव शंभरापेक्षा अधिक राहतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

गेल्या तीन वर्षापासून नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. त्यामुळे तेल्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. मृग बहारात पीक घेणे खूप खर्चिक झाले आहे. शेतकऱ्यांनी हस्त व आंबे बहार प्रामुख्याने घ्यावा. त्यातही आंबे बहार डिसेंबर-जानेवारी महिन्यात धरावा. तेल्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी.

- अरुण देवरे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र डाळींब उत्पादक संघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com