नाशिक : तालुक्यातील जलालपूर शिवारात दोघा भावांमध्ये शेतीच्या वादातून हाणामारी (Fight) झाली. यामध्ये एकाला टिकावाचा वर्मी घाव बसल्याने त्याचा मृत्यू (Death) झाला. या प्रकरणी संशयित भावासह भावजय व पुतण्याविरुद्ध नाशिक तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Murder of brother in agricultural dispute Nashik crime news)
बळवंत कोंडाजी शेळके (वय ५७, रा. यशवंत नगर, मुंगसरा), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संशयित श्रीहरी कोंडाजी शेळके, सुमन श्रीहरी शेळके, जयदीप श्रीहरी शेळके यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलालपूर शिवारात गुरुवारी (ता. १६) दुपारी बाराच्या सुमारास दोन्ही कुटुंबीयांमध्ये शेतीच्या वादातून हाणामारी झाली. या वेळी बळवंत शेळके यांच्यावर संशयित जयदीप याने हल्ला केला. यात त्यांच्या डोक्यात टिकावाचा वर्मी घाव बसल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना मुलगा अक्षय व भाऊ यशवंत शेळके यांनी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक सारिका अहिरराव व पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
या वेळी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले. तर, श्रीहरी व सुमन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संशयित पुतण्या जयदीप यास पोलिसांनी अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. बळवंत शेळके यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सून असा परिवार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.