नाशिक: प्रशासन- महापौर वादाचे ‘रामायण’ संपुष्टात

बंगला सोडताना कुलकर्णींचा दडपशाहीचा आरोप
सतीश कुलकर्णी
सतीश कुलकर्णीsakal

नाशिक: सहाव्या पंचवार्षिकचा कालावधी संपुष्टात आल्यानंतरही महापौरांचे निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्यावरून माजी महापौर व प्रशासनात सुरू असलेले द्वंद अखेर सतीश कुलकर्णी यांनी माघारीची भूमिका घेतल्यानंतर संपुष्टात आले. मात्र, रामायण बंगला सोडताना कुलकर्णी यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार व प्रशासनाच्या विरोधात बोटे मोडताना विकासाभिमुख दृष्टिकोन नसल्याचे सांगितले.

महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर पाच वर्षांचा कालावधी १३ मार्च २०२२ ला मध्यरात्री संपुष्टात आला. त्यानंतर प्रशासनाने महापौर, उपमहापौरांसह विरोधी पक्षनेते, सभागृह नेते, गटनेत्यांची दालने व वाहने ताब्यात घेतली. महापौरांनीदेखील महापालिकेकडे वाहन जमा केले. मात्र महापौर निवासस्थान ‘रामायण’ ताब्यात ठेवले होते. आयुक्तांच्या सूचनेवरून नगरसचिव राजू कुटे यांनी रामायण बंगला खाली करण्याच्या सूचना दिल्या. त्यापूर्वी कुलकर्णी यांनी प्रशासक कैलास जाधव यांना नागरी विकासकामांचा पाठपुरावा करण्यासाठी रामायणावर काही दिवस थांबणार असल्याचे पत्र सादर केले. प्रशासकांनी रामायणमधील साहित्य काढण्यासाठी रविवार (ता. २०) पर्यंत मुदत दिली.

कुलकर्णी यांनी प्रशासकांना ३१ मार्चपर्यंत ‘रामायण’ बंगल्यात वास्तव्य राहू देण्याची विनंती केल्यानंतर प्रशासक जाधव यांनी बुधवारी (ता. १६) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमावलीनुसार भाडे आकारणीचे पत्र दिले व बंगल्यावरील मनुष्यबळ काढून घेतले. अडीच वर्षे प्रथम नागरिक राहिलेल्या कुलकर्णी यांना प्रशासनाची कृती अपमानास्पद वाटल्याने गुरुवारी (ता. १७) रामायण बंगल्यावरून जाण्याचा निर्णय घेतला. नगरसेवकांच्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी रामायण निवासस्थानावर थांबणार होतो. परंतु प्रशासनाने भाडे वसुलीचे पत्र देताना लगेचच कर्मचारी वर्ग काढून घेण्याचा निर्णय घेतल्याने यातून प्रशासनाची मानसिकता लक्षात आल्याची प्रतिक्रिया दिली.

दबावतंत्र वापरणे, दडपशाही करणे ही राज्यातील महाविकास आघाडी सरकारची पध्दत आहे त्यामुळे नाशिक शहरात यापेक्षा वेगळे अधिक काही होणे अपेक्षित नाही. त्यामुळे आपण रामायण बंगला सोडत आहे. आतापर्यंत केलेल्या कामांबाबत समाधानी आहे. यापुढे नाशिक साठी सदैव तत्पर राहील.

- सतीश कुलकर्णी,माजी महापौर, नाशिक

पायाभूत प्रकल्पांची पायाभरणी

अडीच वर्षे शहराचा प्रथम नागरिक म्हणून काम बघताना कोरोनाकाळात नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविल्या. शहर विकासासाठी मोठे प्रकल्प राबविले. केंद्र सरकारच्या माध्यमातून शहर विकासासाठी भरीव कामांची पायाभरणी झाली. महापालिकेतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांशी सलोख्याचे संबंध राहिले. आयुक्तांबरोबर चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. यापुढेही नाशिककरांसाठी सदैव तत्पर राहणार असल्याची प्रतिक्रिया माजी महापौर कुलकर्णी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com