
नाशिक : अशोका किंवा श्री. श्री. रवी शंकर मार्गावरून महिला, लहान मुले सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जात असाल तर सावधान..! त्याला कारण म्हणजे सध्या या दोन्ही मार्गावर ‘फटका गॅंग’ ने दहशत निर्माण केली आहे. पंधरा दिवसापासून एका मोटारसायकलवर तीन ते चार जण बसून येतात.
मागून अचानक बेल्ट, बॅट किंवा दंडूक्याचा फटका मारून सरळ वेगाने निघून जातात. एका पाठोपाठ आठ ते दहा हल्ले झाल्याने सकाळ- सायंकाळ बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. पोलिसांकडे तक्रार करूनही फक्त या भागात सायरन वाजविण्यापुरती कारवाई मर्यादित राहीली.
स्थानिक लोकप्रतिनिधीदेखील या प्रकरणात लक्ष घालत नसल्याने नागरिकांना या टोळक्याचा बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे. या घटनांमुळे या भागातील शांतता भंग पावून भविष्यात दंगलीसारखा मोठा प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. (Nashik Crime terror of Fatka gang on Ashoka road marathi news)
घटना क्रमांक- एक
- वेळ व वार- सोमवार (ता. ८)
- ठिकाण- श्री.श्री. रविशंकर मार्ग.
- प्रकार- बारावी परिक्षा आटोपून काकांना व्यवसायात मदत करण्यासाठी संगमनेरहून आलेला विवेक गांधी हा मुलगा सायंकाळी श्री.श्री.रविशंकर मार्गाहून जात असताना नंबर प्लेट नसलेल्या एका दुचाकीवर बसून चौघे मागून आले. त्यांनी विवेकच्या डोक्यात कमरेचा बेल्ट मारला. काही सेकंदात तीन ते चार वेळा बेल्टचे फटके पडले.
काही कळायच्या आत दुचाकीस्वार फरार झाले. भांबावलेल्या विवेकला आपले अपहरण करण्यासाठी गुंड आले का, असे काही काळ वाटले. फटका जोरात बसल्याने फुटपाथवरच थोडावेळ बसून काकांना प्रकार सांगितला. काका मंगेश गांधी यांनी पोलिसांना कळविल्यानंतर काही वेळात पोलिस व्हॅन दाखल झाली.
घटना घडल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यानंतर फटका गॅंगच्या दहशतीचा उलगडा होत गेला. पंधरा दिवसांपासून फटका गॅंगने या दोन्ही मार्गावर दहशत माजवून ठेवली आहे. कधी अशोका मार्ग तर कधी रविशंकर मार्ग, या दोन्ही मार्गाला समांतर सहा व सात मीटरचे रस्ते आहेत. या रुंद रस्त्यांवर बहुतांश ठिकाणी इमारती झाल्याने पळून जाणे सोपे होते.
एक-दोनदा नव्हे तर आठ ते दहा वेळा असे प्रकार घडल्याने नागरिक सकाळ-सायंकाळ बाहेर पडताना घाबरतात. पोलिसांना सर्व प्रकार माहीत आहेत. फटका गॅंगच्या त्रासाला कंटाळलेल्या महिलांनी मुंबई नाका पोलिसांकडे तक्रार अर्ज देखील दिला. परंतु फटका गॅंगचे दहशतीचे कारनामे वाढतच आहे. (latest marathi news)
पोलिसांची भूमिका
मंगेश गांधी यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रविशंकर मार्गावर पोलिस आले. त्यांनी गोविंदनगरप्रमाणेच गतिरोधक या मार्गावर टाकण्याचा सल्ला दिला.
नागरिकांची पोलिसांप्रति भूमिका
पोलिस प्रत्येक नागरिकाला सुरक्षा पुरवू शकतं नाही. परंतु नाकाबंदी, वाहने तपासणी तसेच टवाळखोरांचा बंदोबस्त करणे अपेक्षित आहे.
नागरिकांची लोकप्रतिनिधींप्रति भूमिका
निवडणुका आल्याने लोकप्रतिनिधी वाद अंगावर घेणार नाहीत. किमान अशा घटनांना पोलिसांमार्फत ब्रेक लावण्याची गरज आहे.
"प्रभाग २३ मधील गणेशबाबानगर, अशोका, रविशंकर मार्ग या ठिकाणी सकाळी व सायंकाळी फिरायला जाणाऱ्या महिला, पुरुषांना होणारे हल्ले सातत्याने वाढले आहे. पोलिसांनी बंदोबस्त करावा."- संध्या कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष, भाजप.
"पोलिस प्रत्येकाला बंदोबस्त देवू शकतं नाही. परंतु सातत्याने घडणाऱ्या घटनांचा बंदोबस्त शक्य आहे. पोलिसांना नागरिकांचे सहकार्य राहील."- मंगेश गांधी, विवेकचे काका.
"अचानक मागून आलेल्या टवाळखोरांनी डोक्यावर बेल्टने मारले. काही कळायच्या आत ते दुचाकीवरून फरार झाले."- विवेक गांधी, हल्ला झालेला मुलगा.
"पंधरा दिवसांपासून सातत्याने अशा घटना घडतं असल्याने नागरिक बाहेर फिरायला येत नाही."
- राजेश सेन, सलून व्यावसायिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.