येवला : दुष्काळी, अवर्षणप्रवण आणि नेहमीच टंचाईग्रस्त असलेल्या येवला तालुक्यात यंदा खरिपाची पूर्ण वाट लागली. सर्वच पिकांत हजार कोटीपर्यंत उत्पन्नाची झळ सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. नुकसान शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारे ठरले. एवढ्या मोठ्या नुकसानीच्या बदल्यात शासनाकडून अवघी ६३ कोटींची मदत मिळणार असून, ‘दुष्काळात तेरावा महिना’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. (Nashik Crop Damage Loss of thousands of crores compensation only 63 crores marathi news)
जून-जुलैत झालेल्या रिमझिम पावसावर पेरण्या झाल्या. कपाशी, मका, कांदे, सोयाबीन शेतातच पावसाअभावी करपले. अनेकांनी उभ्या पिकांत नांगर फिरवला. सर्वाधिक ३६ हजार हेक्टरवर मकाची पेरणी झाली होती. मात्र, हे पीक बहुतांशी प्रमाणात चाऱ्यापुरतेच आले. सोयाबीन, मूग, भुईमूग या पिकांचा फक्त सांगाडा शेतात दिसला.
खरीप गेला, पण सरतेशेवटी पाऊस आल्यास रब्बी फुलेल, ही अपेक्षाही पावसाच्या अवकृपेमुळे केवळ स्वप्नात राहिली. परिणामी, दोन्ही हंगामातून शेतकऱ्यांना हजार कोटींची झळ बसली. येथील बाजार समितीत २०२२ मध्ये ६४४ कोटींचा, तर २०२३ मध्ये ५१९ कोटींचा शेतमाल विक्री झाला होता.
फक्त मकाचा विचार केला, तरी येथे ४०० ते ५०० कोटींचा मका पिकतो. कांद्याची उलाढालही ५०० कोटींहून अधिक असते. सर्व पिकांत या वर्षी केवळ २५ ते ४० टक्केच उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती आले. ७० टक्क्यांपर्यंत नुकसान झेलण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.
प्रशासनाने वेळोवेळी नुकसानीचे पंचनामे केले होते. त्यातच पहिल्या टप्प्यात पूर्ण तालुका दुष्काळी जाहीर झाला. शासनाकडून तालुक्यासाठी ६३ हजार ८९८ शेतकऱ्यांना ६३ कोटी ३३ लाख रुपये अनुदान मिळाले आहे. तहसील कार्यालयामार्फत याद्या बनविण्याचे काम वेगाने सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टरी साडेआठ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
भांडवल ५० हजार ते ५ लाखापर्यंत
मशागत, पेरणी, बियाणे खरेदीसह खरिपासाठी लाखो रुपयांचे भांडवल गुंतवले. मात्र, पिके शेतातच पाचोळा झाल्याने रुपयाचे उत्पन्न हाती आलेले नाही. शेतकऱ्यांनी कमीतकमी ५० हजार ते पाच लाखांपेक्षा अधिक भांडवल गुंतवणूक केले होते. मात्र, उत्पन्न अन् गुंतवलेले भांडवल दूरच आता दहा-वीस हजारांची भरपाई हाती येणार असल्याने ‘हाती धुपाटने आले’, असे म्हणायची वेळ आली आहे.
"अनुदानवाटप करण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या याद्या बनविण्याचे काम सुरू आहे. अद्याप काही शेतकऱ्यांनी आधारकार्ड व बँक तपशील जमा केलेला नाही. त्या शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे तत्काळ तलाठ्यांकडे तत्काळ जमा करावीत."
-आबा महाजन, तहसीलदार, येवला
आकडे बोलतात
बाधित शेतकरी : ६३८९८
-दोन हेक्टर मर्यादेत बाधित क्षेत्र : ६८९२७ हेक्टर
-दोन हेक्टर मर्यादेत निधी : ५८ कोटी ५८ लाख
-दोन ते तीन हेक्टर मर्यादेत बाधित क्षेत्र : ५५७९ हेक्टर
-दोन ते तीन हेक्टर मर्यादेत निधी : ४ कोटी ७४ लाख
-एकूण मंजूर निधी : ६३ कोटी ३३ लाख
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.