Nashik Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच आमदार, खासदार, मंत्री व लोकप्रतिनिधींकडील शासकीय वाहने जिल्हा प्रशासनाकडे जमा केली जातील. नेत्यांचे पोस्टर्स, बॅनर, भित्तिचित्रही झाकले जातील, त्यादृष्टीने प्रत्येक शासकीय विभागाने काय काळजी घ्यावी, याचे निर्देश जिल्हा निवडणूक विभागाने सर्व कार्यालयांना दिले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने १२ ऑक्टोबर २०२३ ला आचारसंहिताकाळात पाळावयाची नियमावली राज्य निवडणूक आयोगाला कळविली आहे. (nashik District Election Department statement code of conduct for Lok Sabha election soon)
त्यानुसार कोणतेही मंत्री, आमदार, अगदी मुख्यमंत्रीही निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला भेटू शकत नाहीत. सरकारी विमान, वाहने कोणत्याही पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या फायद्यासाठी वापरता येत नाहीत. मंत्री-मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानापासून ते कार्यालयापर्यंत शासकीय वाहनाचा वापर केवळ शासकीय कामासाठी करता येतो. याशिवाय राज्य सरकारचा कोणताही मंत्री किंवा कोणताही राजकीय कार्यकर्ता सायरन वाजवणारी गाडी खासगी असली तरी तिचा वापर करू शकत नाही.
अशा सूचना, असे असतील निर्बंध
आचारसंहितेच्या काळात सरकारी पैसा जाहिरातींसाठी किंवा जनसंपर्कासाठी वापरता येत नाही. नवीन नियोजन, बांधकाम, उद्घाटन किंवा पायाभरणी करता येत नाही. दरम्यान, जर काही काम आधीच सुरू झाले असेल तर ते पुढे चालू ठेवता येतात. कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती किंवा साथीचे आजार उद्भवल्यास, अशा वेळी सरकारला काही उपाययोजना करायच्या असतील तर आधी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.
केंद्र किंवा राज्याचा कोणताही मंत्री निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याला बोलावू शकत नाही. कोणत्याही उमेदवाराने आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास त्याला प्रचार करण्यास बंदी घातली जाते. तसेच उल्लंघन केल्याबद्दल उमेदवारावर फौजदारी गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो. एवढेच नाही, तर तुरुंगात जाण्याचीही तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. (latest marathi news)
बदलीसाठी नियमावली
आचारसंहितेत सरकार कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची बदली किंवा पदस्थापना करू शकत नाही. कोणत्याही अधिकाऱ्याची बदली किंवा पदस्थापना आवश्यक असल्यास आयोगाची परवानगी घ्यावी लागते. आचारसंहितेच्या काळात मंत्री, मुख्यमंत्री, आमदारांवर अनेक निर्बंध लादले जातात. सरकारला काहीही करायचे असेल तर आधी आयोगाला सांगून त्याची मान्यता घ्यावी लागते.
रात्री १० ते सकाळी ६ प्रचार बंद
मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाचा निवडणूक प्रचारासाठी वापर करता येत नाही. राजकीय पक्ष प्रचारासाठी कितीही वाहने (दुचाकीसह) वापरू शकतात; मात्र आधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला रॅली किंवा मिरवणूक काढण्यापूर्वी किंवा निवडणूक सभा घेण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. त्याशिवाय रात्री १० ते सकाळी ६, या वेळेत डीजे वापरता येत नाही. रॅली काढायची असली तरी ती सकाळी सहाच्या आधी आणि रात्री दहाच्या नंतर घेता येत नाही.
"आचारसंहिता लागू झाल्यानंतर काय काळजी घ्यावी, याविषयीच्या सूचना सर्व शासकीय कार्यालयांना पाठविल्या आहेत. आचारसंहिता लागू झाल्याच्या क्षणी त्याची अंमलबजावणी सुरू होईल. प्रशासनाने त्यादृष्टीने संपूर्ण तयारी केली आहे."- डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक विभाग, नाशिक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.