नाशिक : नातेसंबंधात वाणीचे महत्त्व अगाध

जीवनात सर्वच जागी नातेसंबंधात वाणीचे महत्त्व अगाध आहे,
नातेसंबंधात वाणीचे महत्त्व अगाध
नातेसंबंधात वाणीचे महत्त्व अगाध sakla

म्हसरूळ : मनुष्य सोने, हिरा-मोत्यांच्या अलंकाराने नव्हे तर त्याचा सद्गुण, मधुर, मृदू आणि विनम्र वाणीने श्रीमंत होतो. मृदू, प्रेमळ संवाद, आवश्यक तिथे मौन, सीमित संभाषणाने जगातील ८० टक्के समस्यांचे निराकरण शक्य आहे. अशी वाणी असणाऱ्या व्यक्तीला कीर्ती, यश जलद मिळण्यासह तो इतरांच्या आदर आणि प्रेमास प्राप्त होतो. जीवनात सर्वच जागी नातेसंबंधात वाणीचे महत्त्व अगाध आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत आचार्य पुलक सागरजी यांनी केले.

धनदाई लॉन्स येथे सकल जैन समाज व सेवा संघातर्फे आयोजित ज्ञानगंगा महोत्सवाचे तृतीय पुष्प ‘मनुष्याची वाणी आणि व्यवहार’ या विषयावर निरूपण करून आचार्य पुलक सागर यांनी आपल्या रसाळ वाणीने गुंफले. ते म्हणाले, मनुष्याच्या वाणीत दुखवणारी धार नव्हे तर विणेची झंकार असावी, आवश्यक तिथे बोलावे. मधुर आणि मृदूच बोलावे म्हणूनच ईश्वराने जिभेमध्ये हाड दिले नाही. जगातील ९५ टक्के समस्या, अति बोलणे, नको तिथे तोंड उघडणे आणि जिथे मौन बाळगायचे तिथे बोलण्याने झाल्या आहेत,

असे सांगून आचार्य पुलक सागर यांनी महाभारतात द्रौपदीने दुर्योधनाचा अपमान कसा केला आणि पुढे महाभारत कसे घडले हे सांगितले. राजप्रासादातील व्यक्ती सोन्याने मढवल्या असतील पण त्यांच्याकडे मृदू वाणी, सभ्य, आदरयुक्त वर्तणूक नसेल तर कुणीही स्वतःचा अपमान करून घेण्यास त्यांच्याकडे जाणार नाही. पण चंद्रमौळी झोपडीतील गरीब व्यक्ती जर व्यवहारात आदर, प्रेम आणि वाणीत माधुर्य ठेवून बोलत असेल तर त्याच व्यक्ती लोकसंचय, धनसंचय, कीर्ती आणि आदर प्राप्त करतात आणि तीच खरी मानवाची दौलत आहे. नोकरी, व्यवसाय, व्यापार आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध करण्यात मृदू, नम्र वाणीच लागते जी यशाचा मार्ग दाखवते. प्रारंभी महोत्सवात अमित साखला, प्रकाश साखला व साखला परिवारातर्फे दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमतर्फे प्रसादाचे आयोजन करण्यात आले. शास्त्रभेट सुमेर काले व सुवर्णा काले यांच्यातर्फे करण्यात आले

कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष वर्धमान लुंकड होते. गुरुपूजन भूषण कासलीवाल, जयचंद कासलीवाल यांनी केले. आहारदाता जैन समाज (सातपूर) यांच्यातर्फे करण्यात आले. सूत्रसंचालन औरंगाबादस्थित प्रवीण लोहाडे यांनी केले. याप्रसंगी आमदार सुहास कांदे, ॲड. राहुल कासलीवाल, मीनल दगडेउपस्थित होते.

आचार्य पुलक सागरजी : ज्ञानगंगा महोत्सवाचे तृतीय पुष्प

महावीर जयंतीनिमित्त आज शोभायात्रा

अनेक वर्षांपासून भगवान महावीर जयंतीचे आयोजन जैन सेवा संघाकडून करण्यात येत असून याही वर्षी भव्य शोभायात्रा आणि मिरवणूक गुरुवारी (ता. १४) आर. के. स्थानक येथून काढण्यात येणार आहे. समारोप धनदाई लॉन्स येथे होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com