Nashik News : आयुष्यात आलेल्या पुरुषांव्यतिरिक्त अमृता प्रीतम यांचे स्वतःचे एक स्वतंत्र जग होते. त्यांच्या संपूर्ण जीवनाला त्यांनी शब्दांच्या माध्यमातून साहित्यात मोकळी वाट करून दिली. आजच्या आधुनिक काळातील तरुणींना अमृता प्रीतम यांच्यासारखे आयुष्य जगायला आवडणे हेच या लेखिकेचे यश आहे. कारण महिलांचे जग साहित्यात आणणाऱ्या अमृता प्रीतम आजही तेवढ्याच प्रेरणादायी आहेत. (nashik Sakal organized Amrita Sahir imroz drama experiment for women )
‘सकाळ’ तर्फे खास महिलांसाठी बुधवारी (ता. १७) ‘अमृता साहिर इमरोज’ या दोन अंकी नाट्य प्रयोगाचे आयोजन महाकवी कालिदास कलामंदिर येथे करण्यात आले होते. या नाट्य प्रयोगातून उदात्त प्रेमाची तरल कथा रसिकांना निखळ आनंद देणारी ठरली. मनाला भिडणाऱ्या संवादाला भरभरून दाद, तर साहिर अमृता यांनी शब्दांचा आधार घेऊन एकमेकांसाठी व्यक्त केलेल्या प्रेमाला मिळालेली भावनेची किनार लाभली. नाटकातील या प्रसंगांनी प्रेमाची व्याख्या नव्याने अधोरेखित केली.
अमृता साहिर इमरोज नाटक समकालीन काळात अमृता प्रीतम यांचे जीवन व साहित्य याचे महत्त्व तसेच स्वातंत्र्य व प्रेम याचा शोध घेणारे नाटक आहे. अमृता यांचे जीवन व साहित्यामधून केवळ इतिहास उलगडत नाही, तर अनेक गुंतागुंतीचे प्रश्न, प्रेम व नातेसंबंध, आपल्या जगण्याची मूलभूत प्रेरणा, समकालीन घडलेला इतिहास, जखडून ठेवणारी सामाजिक भावना, यामध्ये व्यक्तीची होणारी कुचंबणा अशा अनेक स्तरावर हे नाटक प्रवास करते.(latest marathi news)
नात्याची एवढी गुंतागुंत असूनदेखील एक तरल अनुभव देणारे नाटक अंतर्मनात घर करण्यात यशस्वी ठरते. आजच्या द्वेषाच्या काळात कवी साहिर लुधियानवी, लेखिका अमृता प्रीतम, चित्रकार इमरोज हे अव्यक्त प्रेमाची व्याख्या समजावून सांगतात आणि प्रेम असेही असते यावर विश्वास ठेवायला भाग पाडतात.
मंजूषा भिडे (दिग्दर्शिका), शंभु पाटील (लेखक), अक्षय नेहे (प्रकाशयोजना), राहुल निंबाळकर (पार्श्वसंगीत) यांचे होते. हर्षदा कोल्हटकर, सोनाली पाटील व शंभु पाटील यांनी सुंदररीत्या भूमिका वठविल्या तर, नारायण बाविस्कर, हर्षल पाटील यांची निर्मिती होती. या नाटकाचे महाराष्ट्रभर आजवर २३ प्रयोग झाले असून रंगभूमीवरील अनेक मान्यवरांनी या नाटकाचे कौतुक केले आहे.
मान्यवरांचा गौरव
मोलाचे सहकार्य मिळणाऱ्या ज्योती आंबेकर, अजय आंबेकर (माजी सनदी अधिकारी), अविनाश शिंदे (महानगरप्रमुख वंचित बहुजन आघाडी), राजीव सरोदे (संस्थापक, हेल्थ वेल्थ सक्सेस अॅन्ड हॅपिनेस फोरम), अश्विनी न्याहारकर (संस्थापिका, वॉव ग्रुप), तेजस्विनी सोलोमन (तनिष्का सदस्या), डॉ. शरद पाटील (अध्यक्ष, प्रौढ नागरिक मित्रमंडळ), प्रा. छाया लोखंडे (एमएमआरके महिला महाविद्यालय), श्रीराम वाघमारे (नाट्य रसिक ग्रुप) या मान्यवरांना ‘सकाळ’चे उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर नाट्य कलावंताचा सन्मान करण्यात आला.