येवला : टंचाई पाचवीलाच पूजलेल्या अवर्षणप्रवण येवला तालुक्यात यंदा अल्प पावसामुळे टंचाईची धग प्रचंड जाणवत आहे. मे महिन्याच्या वाढत्या उन्हासोबत पाण्यासाठी जनता टाहो फोडत आहे. त्यामुळे तब्बल ११८ गावे, वाड्यांना रोज टॅंकरने पाणीपुरवठा करून तहान भागवली जात आहे. (Yeola Water Scarcity increases)
विशेष म्हणजे दिवसाला अडिच ते तीन लाखावर खर्च पाणीपुरवठ्यासाठी करावा लागत आहे. त्याहूनही गंभीर म्हणजे मागील एप्रिलमध्ये सुरू झालेल्या टँकरची वर्षपूर्ती झाली असून, टंचाईग्रस्त गावांचे शतक पार झाले आहे. ‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरहू पीक आम्ही आमच्या आसवांवरच काढले’ या कवी यशवंत मनोहरांच्या काव्यपंक्तींची याची देही याची डोळा अनुभूती येवलेकर घेत आहे.
तालुका ब्रिटिशकालीन दुष्काळी असून, मागीलवर्षी सुरुवातीपासूनच पावसाने अवकृपा केली आहे. परिणामी, मागीलवर्षी मार्चमध्ये मागणी होऊन तालुक्यात १२ एप्रिलला सुरू झालेले टँकर आजही सुरूच आहे. गंभीर म्हणजे पावसाळाभर काही गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. यावर्षी तालुक्यात फक्त ४२५ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
हा पाऊस रिमझिम स्वरूपाचा असल्याने पावसाळ्यात तालुक्यातील एकही बंधारा, नदी-नाला वाहिला नाही. वरवरच्या पावसाने भूजल पातळीत वाढत न झाल्याने दिवाळीपासून टंचाईचा उद्रेक वाढला आहे. तालुक्यात प्रत्येक उन्हाळ्यात ५० ते ७० गावे-वाड्या टँकरग्रस्त असतात. यावर्षी मात्र हा आकडा शंभरी पार गेला आहे. ग्रामीण भागात सुरुवातीला काही विहिरी व बोरवेल्सला पाणी होते तेही मार्च- एप्रिलपासून आटल्याने पूर्ण मे पाण्याच्या शोधातच चालल्याची स्थिती आहे. (latest marathi news)
उत्तर पूर्व भागात रस्त्याने कुठेही जा रस्त्याच्या कडेला टँकरमधून पाणी भरून घेण्यासाठी ठेवलेली टीपे दिसून येतात. यावरूनच दाहकता लक्षात येते. तालुक्यासाठी ५६ टँकर मंजूर असून, रोज ग्रामीण भागात ११८ खेपा म्हणजेच टँकर सुरू आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात टँकर भरण्यासाठी शहरातील साठवण तलावालगत तब्बल अकरा विहिरी अधिकृत करण्यात आल्या आहेत.
- ५८ गावे, ६० वाड्यांना टँकरने पाणी
- १० ते ३० किलोमीटरचे दररोज फेरे
- दररोज पाचशे ते सहाशे किलोमीटर प्रवास
- दररोज अडिच ते तीन लाख रुपयांचा खर्च
योजनेच्या गावातही टॅंकर!
जागतिक बँकेने गौरवलेल्या ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमुळे ५० वर गावे-वस्त्या टँकरमुक्त झाल्या आहेत. असे असले तरी योजनेचे पाणी दिल्या जाणाऱ्या अनेक गावांच्या वाड्या-वस्त्यांसाठी मात्र टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. ग्रामपंचायतीमार्फत योजनेचे पाणी गावापुरतेच दिले जाते. परिणामी, वस्त्यांवर पाणीच नसल्याने अंदरसूल येथे १८ ते २०, तर नगरसूल येथे २५ वर वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
● पाणीपुरवठा होणारी गावे - ५८, वाड्या - ६० : एकूण - ११८
● एकूण टॅंकर : ५६/खेपा - ११६
● रोजचे अंतर - सुमारे १५०० किमी
● रोजचा खर्च - सुमारे अडीच ते तीन लाख
● अवलंबून लोकसंख्या - दीड लाखावर
● अधिग्रहित विहिरी - नांदूर, धुत, पटेल, प्रज्वल पटेल, सुनील जाधव, पैठणकर, थळकर विहिरी
● पहिल्या टॅंकरची मंजुरी - ११ एप्रिल २०२३
● टॅंकरने पाणीपुरवठ्याचे दिवस : १ वर्ष, १ महिना, ५ दिवस.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.