सावधान! ग्रामीण भागात हळूहळू वाढतेय बाधितांची संख्या

Coronavirus
Coronavirusesakal

येवला (जि. नाशिक) : जिकडे पाहावे तिकडे प्रचंड गर्दी… मास्क लावण्यासाठी टाळाटाळ अन्‌ नियम धाब्यावर..! असे चित्र शहर व तालुक्यात सर्वत्र दिसत असून, यामुळे पुन्हा रुग्णसंख्या वेगाने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या तर हळूहळू रुग्णसंख्येत रोजच वाढ होत आहे. विशेषतः ग्रामीण भागात रोजच नवे रुग्ण निघत असून, पंधरा दिवसांत तब्बल ८७ रुग्ण निघाले आहेत. आकडा शून्यावर येत नसून प्रशासन व सुज्ञ नागरिकांपुढे हा चिंतेचा विषय बनत आहे.

एकीकडे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना येथे मात्र रोजच रुग्ण निघत असल्याने चिंता वाढत आहे. आजमितीस निफाड, सिन्नरनंतर सर्वाधिक रुग्ण येवला तालुक्यात आहेत. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात हाहाकार उडवत २०० च्या आसपास बळी घेतलेल्या कोरोनाने दीड महिन्यापासून हलकासा पूर्णविराम दिला होता. मात्र, ग्रामीण भागातील रुग्णसंख्या थांबायचे नाव घेत नसल्याची स्थिती कायम राहिली. आता तर रोजच रुग्ण निघत असून, पुन्हा एकदा वाढत्या रुग्णसंख्येमुळे तिसऱ्या लाटेची भीती निर्माण होऊ पाहत आहे. गेल्या आठवड्यात शहरातही रुग्ण सापडल्याने अजूनच चिंतेचा विषय बनत आहे. एकीकडे लसीकरणामुळे अनेक नागरिक बिनधास्त असताना आजही लाखो नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. आठवड्यातून एक किंवा दोनच दिवस लसीकरण शिबिर राबविले जाते. इतर दिवशी लस उपलब्धतेअभावी लसीकरण होतच नसल्याने अनेकांना प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे रुग्णसंख्या वाढीचा वेग वाढल्यास पुन्हा पहिल्या व दुसऱ्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची धास्ती नागरिकांच्या मनात आहे.

Coronavirus
नाशिक जिल्ह्यात ५० टक्के पर्जन्यवृष्टी; तर धरणांमध्ये ५२ टक्के साठा

सगळेच झाले बिनधास्त!

नागरिकांची निष्काळजी व प्रशासनाच्या नरमाईच्या भूमिकेमुळे शहरात सर्व नियम पायदळी तुडवले जात असून, सर्वत्र होणारी गर्दी चिंतेचा विषय बनली आहे. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळली तर नक्कीच फायदा होईल. मात्र, आता तर नागरिक मास्क, सुरक्षित अंतरदेखील विसरायला लागले आहेत. ग्रामीण भागातही लसीकरण अल्प असल्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. विशेषत: शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातच रुग्ण वेगाने वाढत असून, सद्यःस्थितीत तालुक्यात ५५ रुग्ण उपचार घेत आहेत. पहिल्या लाटेनंतर अनेक दिवस येथील रुग्णसंख्या शून्य होऊन तालुका कोरोनामुक्त झाला होता. दुसऱ्या लाटेत मात्र अद्यापही आकडा शून्यावर आलेला नसल्याने कोरोनामुक्तीचे स्वप्न दूरच; पण आता पुन्हा कोरोनाचा वेग वाढणार तर नाही ना, ही भीती आहे.

Coronavirus
असंघटितांपर्यत शासकीय मदत पोहोचवा; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

खासगी आकडे गायब…

आरोग्य विभागामार्फत होणाऱ्‍या तपासणीच्या आकड्यांचे रेकॉर्ड होत आहे. मात्र, अनेक रुग्ण खासगी हॉस्पिटल व लॅबमध्ये तपासणी करतात. त्यातील काहींचे आकडे आरोग्य विभागाकडे येत नाहीत. मात्र, ज्यांनी चाचणी न करता एचआरसीटी (स्कॅनिग) केले व ते बाधित निघाले, तर अशांच्या नोंदी कुठेही होत नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शहरांमध्ये कागदोपत्री सहा रुग्ण दिसत असले तरी प्रत्यक्षात हा आकडा दहा ते १५ असल्याचाही अंदाज व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागात १५ दिवसांतील रुग्णवाढ

दिनांक - बाधितसंख्या

२१ - ४

२२ - ७

२३ - ८ (शहर - ३)

२४ - ३ (शहर - १)

२५ - ३

२६ - ०

२७ - १३ (शहर - ३)

२८ - ८ (शहर - १)

२९ - ५

३० - ४ (शहर - २)

३१ - २

१ - ६

२ - ६ (शहर - २)

३ - ४ (शहर - २)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com