मृतदेहासाठी तिरडी बांधणे एक "अनमोल सामाजिक दायित्व"

Raju Lakshman Pardeshi
Raju Lakshman Pardeshiesakal

नाशिक रोड : आजकालच्या स्वार्थांध, महत्त्वाकांक्षा सत्तालोलुप्त जमान्यात कुठलेही मोल न घेता, दिवस- रात्री, मध्यरात्री-रात्री उठून कोणत्याही जागेवर जाऊन मृतासाठी तिरडी बांधणे, हे कार्य करणारे विरळच. मनातील स्वच्छ भाव, मानवसेवा हीच ईश्वरसेवा मानून गांधीनगर, रामदास स्वामीनगर येथील राजू लक्ष्मण परदेशी मागील ५० वर्षांपासून तिरडी बांधण्याचे काम कुठलेही मोल न घेता करीत आले आहेत. अनोळखी व्यक्तींच्या मृतदेहासाठी तिरडी बांधणे, यासाठी ईश्वरानेच माझी निवड केली असेल, असे समजून हे एक अनमोल सामाजिक दायित्व असल्याचेही परदेशी यांनी सांगितले.

मृतदेहासाठी तिरडी बांधणे ही एक कला नसून त्याला केवळ सामाजिक दायित्वची जोड देऊन हे काम मी पाहून शिकलो. गांधीनगर येथील प्रेस कर्मचारी अनिल शिंदे तिरडी बांधण्याचे काम पूर्वी करीत असत. त्यांनीच मला हे काम करण्यास प्रेरित करून कार्याच्या महत्त्वाची जाणीव करून दिली. अद्यापपावेतो ११४ तिरडी बांधल्या आहेत. कोणत्याही व्यक्तीचा अखेरचा प्रवास हा तिरडीवरच होतो, हे अटळ सत्य आहे. (raju lakshman pardeshi invaluable social responsibility of building tirdis free from 50 years Nashik News)

घरापासून ते स्मशानभूमीपर्यंत तिरडीवर नेऊन मृतदेहावर पुढील सोपस्कर पार पाडले जातात. मृतदेहासाठी तिरडी बांधणे, भाग्याचे काम. हे काम प्रत्येकाला जमते, असे नाही. विशिष्ट व्यक्तीलाच बोलावून त्याच्या हस्ते तिरडी बांधली जाते. रात्री सहसा मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात नाही, मात्र अपवादात्मक परिस्थितीत ते होतात.

कधी कधी रात्री-मध्यरात्री लांबून बोलावणे होते. उपनगर, गांधीनगर, आगरटाकळी परिसर याखेरीज जेल रोड, नारायणबापूनगर, मंगलमूर्तीनगर, शिवाजीनगर, आंबेडकरनगर या रहिवासी भागातून बोलावणे होतेच. मात्र, अनेकवेळा इंदिरानगर, द्वारका येथून बोलावणे आल्यावर तिरडी बांधण्यासाठी जावे लागते, असे त्यांनी सांगितले.

वेळप्रसंगी पदरचे पैसे खर्च

हिंदू धर्मशास्त्राचा आधार घेऊन तिरडी बांधण्याचे सोपस्कर पार पाडतो. त्यासाठी वेळप्रसंगी अंत्यविधीचे सर्व साहित्य स्वतः जाऊन आणतो. आर्थिक परिस्थिती अनेकदा हलाखीची असते, हे जाणून वर्गणी जमा करून अंत्यसंस्कार करून दिले जातात. वेळप्रसंगी माझ्याकडील पैसे सामाजिक दायित्व या जाणिवेने लाऊन आलेली वेळ निभावून नेतो.

अनेकवेळा रात्री विशिष्ट ठिकाणी जाण्यासाठी वाहन उपलब्ध नसते. पण देवालाच काळजी असल्याने तशी सोय आपोआप होऊन जातेच, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. मृतदेहासाठी तिरडी बांधणे या कामासाठी देवानेच माझी निवड केली असावी असे मी समजतो, असेही राजू परदेशी म्हणाले.

...तोच खरा साथीदार

मनुष्य जिवंत असेपर्यंत भौतिक सुखाच्या प्रवासात त्याला अनेकांची साथ लाभते. मात्र मृत झाल्यानंतर त्याच्या अखेरच्या काळात मार्गस्थ करण्यासाठी स्मशानभूमीपर्यंत जातो तो खरा साथीदार. मृताच्या अनंताची वाट सुकर करणे, मृतदेहाला सद्‍गती मिळण्यासाठी हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे सोपस्कर पार पाडून त्याचा अखेरचा प्रवास विनासायास होवो, यासाठी कष्ट घेणारे राजू लक्ष्मण परदेशी यांचे कार्य ध्येयवेडे आणि प्रेरणादायी म्हणावे लागेल. ते स्वतः लॉन्ड्री व्यवसाय करतात.

आमचे सर्व कुटुंब धार्मिक वृत्तीचे असल्याने घरातून याकामासाठी विरोध न होता, उलट प्रोत्साहन दिले जाते. तिरडी बांधण्याच्या कामाला मोल नाही, तर हे माझ्यासाठी अनमोल नातं ठरते. मनातील स्वच्छ भाव आणि त्याच्या माध्यमातून प्रसारित होणारे सूक्ष्म आशीर्वाद हेच लाभदायी ठरतात. त्यांच्याच कृपाशीर्वादाने व्यवसाय सुरू असल्याचे राजू लक्ष्मण परदेशी प्रत्येकाला आवर्जून सांगत असतात.

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥

भावार्थ : निसंदेह कोणताही मनुष्य कोणत्याही काळात कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. कारण मनुष्य नैसर्गिक गुणांमुळे कर्म करत राहण्यास बाध्य आहे. याचाच अर्थ असा, की पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर मनुष्य कोणते ना कोणते कार्य करण्यासाठी बांधिल आहे.

प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी वैशिष्ट्य, वेगळेपण असते. आपल्यातील प्रतिभा ओळखून कार्य करत राहणे उपयुक्त ठरते. आवडीच्या कामाचा आनंद मिळतो आणि यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्तही होऊ शकतात. पर्यायाने सुख आणि आनंदाची अनुभूती मनुष्य घेऊ शकतो, असे सांगितले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com