नाशिक : बालविवाहाच्या अनिष्ट प्रथेमुळे मुलींच्या आरोग्यासह भविष्यातील पिढीचे गंभीर प्रश्न तयार होत आहेत. कुपोषणाच्या प्रश्नावर घाव घालणे कठीण होऊन बसले आहे. अशा परिस्थितीत यंत्रणांनी बालविवाह रोखण्यासाठी कंबर कसली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुसरा बालविवाह तीन आठवड्यात रोखला गेला आहे. पोलिस आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अधिकारी थेट मुलीच्या घरी धडकल्याने कुटुंबियांनी विवाहासाठी घातलेला मांडव उतरवला.
टाकेदेवगावजवळील धाराची वाडी (ता. त्र्यंबकेश्वर) येथील साडेसोळा वर्षे वयाच्या मुलीचा विवाह होत असल्याची माहिती पोलिसांपर्यंत धडकली होती. घोटी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रद्धा गंधहास आणि पोलिस यांच्यासह त्र्यंबकेश्वरच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी भारती गेजगे हे मुलीच्या निवासस्थानी पोचले. पोलिसांनी सांगताच, कुटुंबियांनी मुलीचा विवाह न करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, गेल्या महिन्यात बहीण आणि भावाचा विवाह एकाच मांडवात होणार असल्याची माहिती मिळताच, भारती गेजगे या सकाळी मुलीच्या घरी पोचल्या होत्या. मुलीची समजूत घातल्यावर कुटुंबियांनी वऱ्हाड नेण्यासाठी आलेल्यांना मुलीचा विवाह करणार नसल्याचा निरोप दिला. अल्पवयीन मुलींच्या विवाहाची चर्चा बरीच व्हायची. मात्र प्रबोधनाच्या पलिकडे फारसे घडत नव्हते. आता मात्र यंत्रणांनी बालविवाह रोखण्यासाठी वेळीच पोचण्यास सुरवात केल्याने बालविवाहाला राजरोज प्रोत्साहन मिळण्याकडील कल कमी होण्याची आशादायी परिस्थिती तयार झाल्याचे मानले जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.