नाशिक : गंगाघाटावरील पारंपारिक भाजीबाजार हटवून गणेशवाडी भागात तब्बल साडेसहा कोटी रुपये खर्च करून भाजी मंडई उभी केली. परंतु, विक्रेत्यांच्या विरोधामुळे कित्येक दिवस पडून असलेल्या या भाजी मंडईचा वापर आता स्वच्छतागृहासाठी होऊ लागला आहे. त्यामुळे मोजक्या संख्येत असलेल्या भाजी विक्रेत्यांनाही या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. कुंभमेळ्याच्या वेळी सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाकडून गंगाघाटावरील भाजी बाजार हटविण्यात आला. (six half crores property of NMC doors and railings of vegetable market in Ganeshwadi missing Nashik Latest Marathi News)
या वेळी साडेसहाशेपेक्षा अधिक परवानाधारक भाजी विक्रेते गंगाघाटावर व्यवसाय करत होते. या विक्रेत्यांना त्या ठिकाणी सिंहस्थानंतरही व्यवसाय करण्यात मज्जाव करण्यात आल्यावर हे प्रकरण न्यायालयात गेले, अद्यापही ही केस प्रलंबित आहे. दरम्यानच्या काळात महापालिकेने गणेशवाडीतील गाडगे महाराज पुलालगत उभी राहिलेली झोपडपट्टी मोठा पोलिस फौजफाटा घेऊन हटवून त्याजागी भाजी मंडईची उभारणी केली, त्यासाठी तब्बल साडेसहा कोटी रुपये खर्च आला.
मंडईच्या उभारणीनंतर गंगाघाटावरील विक्रेत्यांना नवीन मंडईत व्यवसाय करण्यासाठी आवाहन करूनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने गत कित्येक वर्ष या मंडईचा ताबा भिकारी, गर्दुल्ले व व्यसनींनी घेतला होता. आता मंडईच्या तीस ते चाळीस टक्के भागात भाजीपाल्यासह फूल विक्रेते व्यवसाय करत आहे, मात्र उर्वरित भागाचा ताबा पुन्हा भिकाऱ्यांनी घेतला आहे. हे लोक मंडईच्या आवारातच शौचालयास जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या ठिकाणी पैसे देऊन व्यवसाय करणाऱ्यांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे शेजारीच एक नव्हे तर दोन सुलभ शौचालये आहेत, परंतु त्याचा वापर न करता उघड्यावर शौचास जात आहे.
हागणदारीमुक्तीला हरताळ
केंद्र व राज्य शासनाकडून हागणदारीमुक्त गावांसाठी आवाहन केले जाते, यासाठी अनुदानावर मोठा खर्चही केला जातो. त्यामुळे राज्य हागणदारीमुक्त झाल्याची घोषणाही करण्यात आली आहे. परंतु या योजनेला नाशिकसारख्या ‘स्मार्ट’ शहरातच हरताळ फासला जात आहे. येथे उघड्यावर शौचास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हावी, अशी विक्रेत्यांची मागणी आहे.
टपऱ्याही वापराविनाच पडून
येथे व्यवसाय करण्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यावर काहीजणांनी टपऱ्याही टाकल्या. यासाठी महिना पाच हजार रुपये भाडेही निश्चित करण्यात आले होते, परंतु गेल्या कित्येक महिन्यांपासून या टपऱ्याही धूळखात पडून आहेत. एवढेच नव्हे तर येथील रेलिंग, टपऱ्यांचे शटर, पत्रे, ओट्यांना लावलेले स्टीलही भुरट्यांकडून लक्ष्य होत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.