
Nashik News : समस्यांप्रश्नी ओझर नगरपरिषदेवर धडक मोर्चा!
ओझर (जि. नाशिक) : मुख्याधिकारी कार्यालयात हजर राहत नाही. त्यामुळे विविध समस्यांबाबत चर्चा होत नाही म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी गुरुवारी (ता. २३) मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या रिकाम्या खुर्चीलाच समस्यांचे निवेदन चिकटून गांधीगिरी केली होती.
शुक्रवारी (ता. २४) पुन्हा नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढून मुख्याधिकारी किरण देशमुख यांना समस्यांबाबत निवेदन देण्यात आले आहे. समस्यांचे त्वरित निरसन न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. (strike of people issue on Ozar municipal council Nashik News)
निवेदनाचा आशय असा : पथदीप, घंटागाडी, बंद पडलेले बोअरवेल चालू करावे, ओझर शहर व उपनगर सध्या विविध नागरी समस्यांनी ग्रासले आहे. ओझर शहरासह परिसरातील सर्व उपनगरात अनेक ठिकाणी पथदीप बंद आहेत.
त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांचे फावते आहे. तसेच, चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. ओझर शहरासह परिसरातील सर्व उपनगरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
त्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. घंटागाडी वेळेवर येत नसल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. परिणामी दुर्गंधीत वाढ झाली आहे. डासांचे प्रमाणही वाढल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
ओझर गावात अनेक ठिकाणी बोअरवेल आहेत. परंतु, ते बंद पडलेले असल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना वापरायला पाणी मिळत नसून त्यांची गैरसोय होत आहे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम, किशोर कदम, नितीन जाधव, वैशाली पगारे, अचेना ईगळे, युवराज शेळके, अभिषेक देशमुख, अनिल नवले, बापू चौधरी, ज्ञानेश्वर पगार, विपिन जाधव, अभिजित गायकवाड, आकाश पल्हाळ, दिनेश पटेल व नागरिक उपस्थित होते.