पान चार मेन
--------------------
16921
नाशिक रोड : कलावंत, साहित्यिक आणि वारकरी यांच्या न्याय्य हक्कांसाठी तसेच विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करताना कलावंत.
कलावंतांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन
''कलावंत महामंडळ'' अन् ''कलावंत आमदार'' नियुक्तीसाठी विभागीय आयुक्तांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता. २३ : भारत सरकार नोंदणीकृत प्रकाशपर्व सोशल फाउंडेशन संचलित ''अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती'' या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने कलावंत, साहित्यिक आणि वारकरी यांच्या न्याय्य हक्कांसाठी, तसेच विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
कलावंतांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी स्वतंत्र ''कलावंत आर्थिक विकास महामंडळाची'' स्थापना करावी. विधानसभेत कलावंतांचे प्रश्न आणि समस्या मांडण्यासाठी स्वीकृत सदस्य पद्धतीने ‘कलावंत आमदार’ नियुक्त करावा. राज्यातील कलावंतांना एसटी बस आणि रेल्वे प्रवासात विशेष सवलत लागू करावी. बेघर असलेल्या गरजू कलावंतांना शासनातर्फे मोफत घरे देण्यात यावीत.आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलावंतांच्या मुलांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू करावी. नाशिक शहरात सर्व सुविधायुक्त ‘कलावंत-वारकरी भवन’ उभारण्यात यावे. अशा मागण्या यावेळी कलावंत यांनी निवेदनाद्वारे मांडल्या.
आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष गायक सोमनाथ गायकवाड यांनी केले. या वेळी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रतिभा जगताप-यादव, जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पवार, कोषाध्यक्ष शाहीर सदाशिव भुजंगे, महानगर प्रमुख जयेश सुतार, प्रदेश उपाध्यक्ष गुलाब सय्यद, उत्तर महाराष्ट्र संघटक दत्तात्रेय तांबे, संतोष साळुंखे, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश चव्हाण, हिरामण कौटे, वसंत गवांदे, अभिनेत्री नम्रता रिंगणे, पल्लवी निकम, दीपाली कोठारी, अभिनेता संजय पोळ, सरिता परदेशी, राज यादव, प्रगल्भ गायकवाड आदींसह अनेक क्षेत्रांतील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------
चौकट
तालवाद्यांच्या निनादाने परिसर दुमदुमला
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात कलावंत आणि वारकरी एकत्र आल्याने प्रशासकीय परिसर गजबजून गेला होता. आंदोलनादरम्यान पारंपरिक तालवाद्यांचा निनाद आणि सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या राज्यव्यापी आंदोलनात नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कलावंत व वारकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.