पान ३ साठी--अँकर करणे फोटो वापरणे.
------------
३६-४
शेतकरी समृद्धी रेल्वेच्या शंभर फेऱ्या पूर्ण
---
१४ हजार टनांहून अधिक मालाची वाहतूक; साडेसहा कोटींचा महसूल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता. ६ : शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी किफायतशीर व विश्वासार्ह रेल्वे वाहतुकीचे प्रभावी माध्यम ठरलेल्या देवळाली- दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेने शंभरावी फेरी पूर्ण केली आहे. या सेवेद्वारे आतापर्यंत १४ हजार टनांहून अधिक मालाची वाहतूक करण्यात आली असून, पार्सल वाहतुकीतून सुमारे पाच कोटी १४ लाख रुपयांचा महसूल मिळाला.
या वाहतुकीत पाच हजार ४७२.५० टन नाशवंत वस्तू आणि आठ हजार ५९५.६१ टन इतर पार्सल मालाचा समावेश आहे. या सेवेतून आतापर्यंत ४६ हजार ७२७ प्रवाशांनी प्रवास केला असून, त्यातून सुमारे सव्वा कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. पार्सल व प्रवासी वाहतुकीतून मिळून या गाडीने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाला सुमारे साडेसहा कोटी रुपयांचा महसूल मिळवून दिला.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागासाठी ही सेवा महत्त्वपूर्ण उपलब्धी ठरली आहे. शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांना कृषी उत्पादने, तसेच अन्य माल देशातील विविध बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी किफायतशीर, विश्वासार्ह आणि सुलभ रेल्वे वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते १५ ऑक्टोबर २०२४ ला हिरवा झेंडा दाखवून या रेल्वे सेवेचा प्रारंभ करण्यात आला. ही गाडी दर शनिवारी देवळाली ते दानापूरदरम्यान धावते. गाडीला दहा पार्सल व्हॅन आणि दहा सामान्य श्रेणीचे डबे आहेत. प्रत्येक पार्सल व्हॅनची क्षमता २३ टन आहे.
१६-१
कृषी उत्पादनांसह इतर माल
शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादने तसेच अन्य वस्तूंची वाहतूक करण्यात आली आहे. त्यात डाळिंब १४७.१२ टन, कांदा एक हजार ६५०.६९ टन, सीताफळ २५९.३५ टन, आले २०१.९१ टन, द्राक्षे १२९.८५ टन आणि लिंबू ११९.०६ टन यांचा समावेश आहे. याशिवाय बिस्किटे, चॉकलेट व कँडी सहा हजार ३५३.२४ टन, हग्गीज ५७४.४० टन, व्हीआयपी बॅग ४५६.९६ टन, प्लॅस्टिक बॅग ५६९.५३ टन, प्लॅस्टिक मॅट ५१९.८५ टन, कापड १९४.४८ टन, खाद्यपदार्थ १८७.५७ टन आणि औषधे ९२.६० टन अशा विविध वस्तूंचीही वाहतूक झाली. विविध नाशवंत वस्तूही या सेवेद्वारे देशातील बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यात आल्या.
१६-१
शेतकऱ्यांना फायदा
देवळाली- दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेमुळे नाशिक परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांना कृषी उत्पादने, तसेच अन्य वस्तू दूरवरच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी किफायतशीर आणि प्रभावी रेल्वे-आधारित लॉजिस्टिक्सचा पर्याय उपलब्ध झाला. शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक आणि प्रवाशांसाठी पार्सल तसेच कृषी लॉजिस्टिक्स सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग सातत्याने प्रयत्नशील असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.