फोटो ओळ : 02367
नवी दिल्ली ः ‘न्हाई’चे रजनीश कपूर यांच्या चर्चा करताना आमदार डॉ. राहुल आहेर.
राहुड घाट अपघातांवर तोडगा काढावा
आमदार डॉ. राहुल आहेर ः ‘न्हाई’कडे मागणी; दिल्लीत बैठक
सकाळ वृत्तसेवा
गणूर (चांदवड), ता. १६ : मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटातील वाढते अपघात आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, या अपघातप्रवण घाटाचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी सहापदरी उड्डाणपूल किंवा अन्य पर्यायाचे स्वतंत्र काम तातडीने मंजूर करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केली.
यासंदर्भात डॉ. आहेर यांनी मंगळवारी (ता. १५) नवी दिल्लीत ‘न्हाई’चे डनरल मॅनेजर रजनीश कपूर यांची भेट घेऊन सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा केली. यावेळी त्यांनी घाटातील अपघातांची परिस्थिती, वाढती अवजड वाहतूक आणि अपघातांनंतर निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीची माहिती देत निवेदन दिले.
राहुड घाटात मोठ्या प्रमाणात ट्रक, टँकरसह अवजड वाहनांची वाहतूक होते. घाटातील तीव्र चढ-उतार आणि वळणांमुळे अपघातांचा धोका वाढत आहे.
२८ ऑगस्टला झालेल्या अपघातात ११ जण जखमी झाले होते. तसेच सप्टेंबर २०२५ मध्ये टँकर-ट्रेलरच्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळवावी लागते. त्यामुळे मनमाड, मालेगाव, चांदवड, नाशिक आणि धुळे या मार्गांवर वाहतूक कोंडी होते. राहुड घाट अपघातप्रवण असल्याचे निवेदनात म्हटले असून, पाच वर्षांत येथे २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
राहुड घाटात अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी डॉ. आहेर यांनी केली. प्रस्तावाला मंजुरी मिळवून काम सुरू होईपर्यंत पाठपुरावा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ॲड. विलास देशमाने व जिल्हा परिषद माजी सदस्य प्रशांत देवरे उपस्थित होते.
.........