साडेसात हजारांची लाच स्वीकारताना वनपालला अटक
---
चाळीसगाव सामाजिक वनीकरण विभागात ‘एसीबी’ची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. २४ : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत शेतात लागवड केलेल्या चंदनाच्या झाडांचे बिल काढून देण्यासाठी साडेसात हजारांची लाच स्वीकारताना येथील सामाजिक वनीकरण विभागातील वनपालला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुद्देमालासह पकडले.
तरवाडे (ता. चाळीसगाव) शिवारातील शेतात चंदन वृक्षलागवड व संवर्धनासाठी शासनामार्फत निधी मिळण्यासाठी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र चाळीसगाव येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तक्रारदाराने अर्ज केला होता. त्यांचा अर्ज मंजूर झाला होता. वृक्षलागवड व संवर्धनासाठी प्रतिवर्ष एक लाख ५० हजार रुपयांप्रमाणे तीन वर्षांसाठी साडेचार लाख रुपये मंजूर झाले होते. वृक्षलागवडीसाठी कुशल कामांच्या खर्चाचे बिल सादर केले होते. ५० हजारांचे बिल काढून देण्यासाठी बिलाच्या १५ टक्क्यांप्रमाणे सात हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी वनपाल प्यारेलाल विठ्ठल महाजन (वय ५३) यांनी तक्रारदाराकडे केली. याबाबत तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करून ‘एसीबी’च्या पथकाने बुधवारी (ता. २४) सापळा रचला. वनपाल प्यारेलाल महाजन यांना लाच स्वीकारताना मुद्देमालासह पथकाने पकडले. ही कारवाई पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी व हेमंत नागरे, विनोद चौधरी, अनिल गांगोडे, योगेश शिंदे यांनी केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.