चाळीसगाव तालुका बुद्धविहार
निर्माण समितीच्या बैठकीत चर्चा
सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. १८ ः तालुकास्तरीय बुद्धविहार निर्माण समितीची बैठक समितीचे अध्यक्ष धर्मभूषण बागूल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. यात बुद्ध विहाराची गरज व त्याचे महत्त्व याबाबत धर्मभूषण बागूल यांनी मार्गदर्शन केले.
तथागत भगवान बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मानवतावादी व कल्याणकारी तत्वज्ञान तसेच त्यांचे कार्य सर्व समाजाला व येणाऱ्या पिढीला समजावून सांगण्यासाठी बुद्धविहार अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून बुद्धविहार हे चळवळीचे केंद्र बनले पाहिजे. त्यासाठी गावागावात बुद्धविहार निर्माण झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले. शहरातील कन्नड रस्त्यालगत सुमारे १० एकर निसर्गरम्य परिसरात बुद्ध विहाराची भव्य इमारत निर्माण करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तालुका बौद्ध पंचायतीसाठी ५ हजार स्क्वेअर फूट जागा बौद्ध पंचायतीच्या नावे करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली असून लवकरच हा प्रस्ताव मंजूर होऊ शकतो अशीही माहिती या बैठकीत देण्यात आली. बैठकीला ज्येष्ठ बौद्धाचार्य भय्यासाहेब ब्राह्मणे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुनील भालेराव (ठाणे), देविदास जाधव, सुधाकर मोरे, नगरसेवक युवराज जाधव, पालिकेचे आरोग्याधिकारी विजय जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र निकम, बहुजन आझाद सेनेचे अध्यक्ष स्वप्नील जाधव, महिला नेत्या सोनाली लोखंडे, पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय महासचिव सूर्यकांत कदम, सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव, समता सैनिक दलाचे शहराध्यक्ष विशाल पगारे, समता सैनिक दल समर्थक अजय सोनवणे, युवा कार्यकर्ते दीपक बागूल, ज्ञानेश्वर बागूल, प्रशांत जाधव, शशिकांत जाधव, संदीप निकम, नाना जाधव, महेश जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते. पुढील बैठक ४ ऑक्टोबरला घेण्याचे ठरले. या बैठकीला जास्तीत जास्त समाजबांधव उपस्थित राहतील असा प्रयत्न करावा, असे आवाहन धर्मभूषण बागूल यांनी केले. सुधाकर मोरे यांनी आभार मानले.
--------------------------