चाळीसगावमध्ये रंगणार ‘भुलाबाई महोत्सव’
‘रंगगंध’तर्फे आयोजन; रविवारी सामंत विद्यालयात प्राथमिक फेरी
सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. २० ः शहरात पुन्हा एकदा ‘भुलाबाई महोत्सव २०२६’चा रंगतदार सोहळा रंगणार आहे. केशवस्मृती प्रतिष्ठान, जळगाव यांच्यातर्फे २३ वर्षांपासून महिलांसाठी भव्य ‘भुलाबाई महोत्सव’ आयोजित केला जात आहे. या उपक्रमाचा विस्तार करीत मागील वर्षापासून जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या ठिकाणी प्राथमिक फेऱ्यांचे आयोजन केले जात आहे.
येथील रंगगंध कलासक्त न्यासतर्फे या महोत्सवाची प्राथमिक फेरी रविवारी (ता. २७) शहरातील तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. ५ ते १० वर्षे लहान गट, ११ ते १६ वर्षे मोठा गट व १७ वर्षांवरील खुला गट अशा तीन गटात ही स्पर्धा होईल. प्रत्येक संघामध्ये किमान ८ आणि कमाल १५ जणांचा सहभाग अपेक्षित आहे. भुलाबाईची पारंपरिक गाणी, नृत्य, गायन, वादन तसेच लेखन अशा विविध कलांना या स्पर्धेत वाव देण्यात आला आहे. प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी कमाल पाच मिनिटांचा वेळ मिळणार आहे. खुल्या गटातील स्पर्धकांना मूळ गाणी आणि चाल कायम ठेवून त्यामध्ये सामाजिक संदेश देणारी नवीन कडवी लिहिता येणार आहेत. ध्वनीमुद्रित गाण्यांना परवानगी नाही. महोत्सवात पारंपरिक कलाविष्काराला प्राधान्य देण्यात आले असून ध्वनीमुद्रित गाणी, सीडी, पेनड्राइव्ह आदींचा वापर करता येणार नाही. त्यामुळे प्रत्यक्ष गायन, वादन आणि सादरीकरणातून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. २४ सप्टेंबरपर्यंत प्रवेशाची अंतिम मुदत आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी २ ऑक्टोबरला जळगाव येथे होणार आहे. चाळीसगावसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये होणाऱ्या प्राथमिक फेऱ्यांमधून निवड होणाऱ्या दोन संघांसाठी २ ऑक्टोबरला अंतिम फेरीत सहभागी होता येईल. तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालये, महिला मंडळे, सांस्कृतिक संस्था तसेच कलाप्रेमी गटांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व रसिक प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘रंगगंध’च्या सचिव डॉ. मीनाक्षी करंबेळकरव ‘रंगगंध’ परिवाराने केले आहे.
-------------------------