जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत उद्यापासून ‘सेवा संकल्प अभियान’
२ ऑक्टोंबरला प्रत्येक तालुक्यात‘नमो सेवागाथा’ कार्यक्रम: शिक्षण विभागाचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता.१५ : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि विकसित भारत २०४७ यांच्या परिपूर्णतेसाठीच्या पाश्र्वभूमीवर तसेच विकसित भारताची संकल्पना साकारण्यासाठी ‘नमो सेवागाथा’ कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली आहे. या संकल्पनेवर आधारीत केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहचावी या महत्वाकांक्षी उद्देशाने शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच सर्व अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये गुरूवारपासून (ता.१७ सप्टेंबर) ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.
प्रत्येक तालुक्यात ‘नमो सेवागाथा’
विकसित भारत २०४७’ या संकल्पनेवर आधारित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. उत्कृष्ट चित्रे व वक्तृत्व सादरीकरणांचे शाळा, जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. तसेच २ ऑक्टोबर रोजी प्रत्येक तालुक्यात ‘नमो सेवागाथा’ कार्यक्रम घेण्यात येणार असून,कला व नाट्य पथकांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
एका सेवा उपक्रमाची
सेवा माझे योगदान’ अंतर्गत स्वच्छता, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती, कचरा वर्गीकरण, जलसंधारण, रस्ता सुरक्षा,सायबर सुरक्षा, सैनिकांचा सन्मान, दिव्यांगजन सहयोग आदी उपक्रम घेता येणार आहेत. याशिवाय इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, डिजिटल साक्षरता तसेच वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.याबाबत प्रत्येक शाळेने स्थानिक गरजेनुसार किमान एका अर्थपूर्ण सेवा उपक्रमाची अंमलबजावणी करावी.मुख्याध्यापक शाळास्तरीय समन्वयक, गटशिक्षण अधिकारी तालुकास्तरीय नोडल अधिकारी, तर शिक्षणाधिकारी जिल्हास्तरीय समन्वयक राहणार आहेत. उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ व यशोगाथांचे दस्तऐवजीकरण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शाळांची गुणवत्तादर्शक कामगिरी तसेच यशस्वी उपक्रमांची अंमलबजावणी याबाबत पडताळणी होण्यास मदत होणार असून येत्या काळात प्रत्येक गटात एक प्रभावी राबविण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले असून शासन निर्देशानुसार प्रत्येक तालुक्यास निर्देश देण्यात आले आहेत.
- साईलता सामलेटी, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद
शाळांच्या गुणवत्ता, दर्जा, समाज सहभाग व शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्याचा सर्वत्र प्रयत्न होत आहे. संकल्प अभियानातून या प्रक्रियेस अधिक गती मिळणार आहे.
- बाळासाहेब मुंडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती,इगतपुरी