सेकंड मेन
सौर कृषी साठी गायरान जमीन देण्यास विरोध
-------------------------------------
भैताणे दिगर सरपंच, सदस्यांसह ग्रामस्थांचा प्रकल्पाला विरोध
सकाळ वृत्तसेवा
कळवण, ता. २४ : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत भैताणे दिगर (ता. कळवण) येथील गायरान जमीन सौर प्रकल्पासाठी देण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. गायरान क्षेत्र गुरांच्या चरण्यासाठी तसेच धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वापरले जात असल्याने प्रस्तावित प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि आदिवासी बांधवांनी केली.
भैताणे दिगरच्या सरपंच दीपाली कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकारी काश्मिरा संखे, तहसीलदार रोहिदास वारुळे आणि गटविकास अधिकारी रमेश वाघ यांची भेट घेऊन निवेदन दिले.
ग्रामसभेचा विरोध
तहसीलदार कार्यालयाच्या १२ मे २०२६ च्या पत्रानुसार मंजूर सौर प्रकल्पासाठी भैताणे दिगर ग्रामपंचायतीकडे गट क्रमांक ३३ मधील जागेची मागणी करण्यात आली होती. मात्र ग्रामसभेत ठराव करून ग्रामस्थांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. संबंधित जागा सार्वजनिक उपयोगासाठी तसेच भविष्यातील गावठाण विस्तारासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील गुरांच्या संख्येच्या तुलनेत चरण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे गायरान क्षेत्र कमी झाल्यास गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याशिवाय आदिवासी समाजाचे पारंपरिक डोंगरादेव व इतर धार्मिक कार्यक्रम याच परिसरात आयोजित केले जातात. संबंधित गायरान क्षेत्रात कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवार योजनेतून बंधारा उभारला असून सामाजिक वनीकरण विभागाने वृक्षारोपणही केले आहे.
चौकट
आंदोलनाचा इशारा
महसूल व पंचायत समिती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीत बैठक घेऊन ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सरपंच दीपाली कोल्हे, सदस्य माया पवार, चंदर पवार, सुदाम भोये तसेच ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. शासन, महसूल विभाग किंवा पोलिस प्रशासनाने ग्रामस्थांचा विरोध डावलून गायरान जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोट
“भैताणे दिगर गावाच्या अडचणी शासनाने समजून घ्याव्यात. गायरान क्षेत्र गुरांना चरण्यासाठी तसेच धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आवश्यक आहे. लोकभावनेचा विचार करून सौर प्रकल्प रद्द करावा.
- दीपाली कोल्हे (सरपंच )
“भैताणे दिगर गावच्या अडचणी शासनाने समजून घ्याव्यात. गायरान क्षेत्र गुरांना चरण्यासाठी व धार्मिक-सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आवश्यक आहे. लोकभावनेचा विचार करून सौर प्रकल्प रद्द करावा,”
सौ. दीपाली कोल्हे
सरपंच भैताणे दिगर
नाशिक :- सहाय्यक जिल्हाधिकारी काश्मिरा संखे यांना निवेदन देतांना सरपंच दीपाली कोल्हे व ग्रामस्थ