‘प्रश्न विचारा, कारण शोधा; संशोधनवृत्ती जोपासा’
----------------------------------------
डॉ. गोराणे ः अंधश्रध्दा निमूर्लन व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
नांदुरी, ता. ९ : वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे ही संशोधनाची पहिली पायरी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता प्रश्न विचारण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची आणि सत्य पडताळून पाहण्याची सवय लावून संशोधनवृत्ती जोपासावी, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे यांनी केले.
बहुद्देशीय ग्रामीण सामाजिक संस्था, विंचूरे संचलित अभोणा येथील स्वामी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी झालेल्या सप्रयोग व्याख्यानात ते बोलत होते.
डॉ. गोराणे म्हणाले, ‘‘भारतीय राज्यघटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य सांगितले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही वैज्ञानिक दृष्टिकोनाला महत्त्व दिले आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या काळापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारल्यास त्यांच्या विचारांना तर्काची जोड मिळून संशोधनवृत्ती विकसित होईल. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे दैनंदिन जीवनातील अंधश्रद्धांना थारा मिळणार नाही. विशेषतः आदिवासी भागात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी सुशिक्षित तरुणांनी पुढाकार घेऊन समाजप्रबोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
चौकट
चमत्कार नव्हे, विज्ञान!
व्याख्यानादरम्यान डॉ. गोराणे यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘गोड बाबा’, ‘पाण्यावर पेटणारा दिवा’, ‘माझी श्रद्धा, माझ्या हाती’ आदी तथाकथित चमत्कारांची प्रात्यक्षिके सादर केली. त्यामागील वैज्ञानिक कारणमीमांसा स्पष्ट करून अंधश्रद्धा आणि विज्ञानातील फरक त्यांनी प्रत्यक्ष प्रयोगांतून समजावून सांगितला. सप्रयोग सादरीकरणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आभार प्रा. नम्रता जगताप यांनी मानले. यावेळी सुमारे दोनशे विद्यार्थी-विद्यार्थिनी व प्राध्यापक उपस्थित होते.
कोट
‘‘कोणतीही गोष्ट केवळ सांगितली म्हणून स्वीकारू नका. तिच्यामागील कारण शोधण्याची आणि वैज्ञानिक कसोटीवर ती तपासून पाहण्याची सवय विद्यार्थ्यांनी लावून घ्यावी. हीच वृत्ती पुढे संशोधनाला चालना देते.’’
— डॉ. टी. आर. गोराणे, राज्य प्रधान सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती